दमास्कस (सीरिया) – सीरियातील गृहयुध्दात आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे आतापर्यंत जवळपास 5 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यात बहुसंख्य लहान मुलांचा समावेश आहे. अशा भयानक स्थितीत आता या देशात कुपोषणाची स्थिती रौद्ररूप धारण करते आहे. त्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे.
दरम्यान, या संकटात मदतीचा आधार देत भारताने माणुसकीच्या नात्याने सीरियाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने सीरियाला कुपोषणापासून वाचण्यासाठी 2000 मेट्रिक टन तांदूळ दिला आहे.
अरब देशांमध्ये 2011 मध्ये अरब क्रांतीची सुरुवात झाली. याचे रुपांतर नंतर अराजक परिस्थितीत झाले. त्यामुळे अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली. आता इतक्या वर्षांनी काही देशांमधील ही युद्धजन्य परिस्थिती संपली आहे. मात्र, सीरियात आजही परिस्थिती आणखी वाईटच होताना दिसत आहे. सीरियात मागील दशकभरापासून गृहयुद्ध सुरु आहे.
सीरियातील हे युद्ध कधी थांबणार हे कुणालाही माहिती नाही. मात्र, एकिकडे युद्ध सुरु असताना आता सीरियात अन्नधान्याचाही तुटवडा तयार झालाय. अमेरिका आणि युरोपीयन युनियनने या देशावर अगोदरच निर्बंध लादले असल्यामुळे त्याची अवस्था अगदीच भीषण झाली आहे. अशावेळी भारताने सीरियाला मदतीचा हात दिला आहे.