मराठी सिनेसष्टीत दाखल झालेली अभिनेत्री शाल्वी शहा हिचा आगामी सिनेमा “लॉ ऑफ लव्ह’ येत असून आगामी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत शाल्वीने व्यक्त केलेले विचार…
अभिनयाच्या आवडीसोबत हे क्षेत्र मी करियर करण्याच्या दृष्टिकोनातून निवडलं. त्यात आपला ठसा उमटवायचाच, हे माझं ध्येय आहे. कोणताही अपघात किंवा सहज केलेला प्रयोग म्हणून त्याकडे पाहिलं नाही. पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. बिगिनर असल्यामुळे अनेक लहान मोठ्या भूमिका केल्या. त्यानंतर “लॉ ऑफ लव्ह’ सिनेमाची संधी मिळाली.
‘लॉ ऑफ लव्ह’ सिनेमाच्या निमित्ताने एक मोठी संधी मला मिळाली आहे, त्याचं मी शंभर टक्के सोनं करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकही आमच्या प्रयत्नाला मनापासून दाद देतील. रोमॅंटिक सिनेमा नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीचा विषय राहिला आहे. या सिनेमातील साक्षी आणि आदित्यचं प्रेमही तितकंच अनोखं आहे. मराठी सिनेमे नेहमीच आपल्या विचारांना नवी दिशा देणारे ठरतात. एकाग्र विचार करायला लावणारी कथा दर्दी प्रेक्षकांना भुरळ घालते त्यामुळे मराठी चित्रपटांच्या बाबतीत असलेली उत्सुकता आपण सगळेच पहातो. हा सिनेमा निव्वळ प्रेम कथा नाहीतर तावून सुलाखून निघालेलं प्रेमवीरांचं प्रेम आहे. आजकाल वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार बदललेल्या प्रेमाला आरसा दाखवणारा हा सिनेमा आहे.
प्रत्येक क्षेत्रात नाव कमविण्यासाठी किंवा स्वतःचं स्थान मिळवण्यासाठी मेहनत आणि स्वतःतील वेगळेपणासिद्ध करावा लागतो त्यात दुमत नाही. मात्र अनपेक्षित अशा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामापेक्षा मोठया शहरातील काम करण्याची ठिकाणंही भीतीदायक वाटतात. कामाच्या ठिकाणी असलेली असुरक्षितता कमी झाली तर महिलांच्या प्रगतीतील मोठा अडथळा दूर होईल. अभिनेत्री या नात्याने शुटिंगचे लोकेशन नक्कीच सगळ्या बाबतील सुरक्षित असायला हवे.
वाचताना बऱ्याच जणांना काहीसं बोजड वाटेल पण, निसर्गानेच महिला आणि पुरुष यांना एकसारखं बनवलं नाही; तर काही बाबतीत विभिन्नता ही असणारच. महिलांच्या ठायी असलेली स्वीकृती किंवा कोणतीही गोष्ट सहज स्वीकारणं हा उत्तमगुणधर्म आहे. परिस्थिती म्हणा, रीती परंपरा, माणसं सहजपणे आपण आपलीशी करतो त्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. परंतु परिस्थिती स्वीकारत असताना ते स्वीकारण्याची आपली मर्यादा आहे याचंही भान आपण महिलांनी ठेवला पहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर स्वीकारणं म्हणजे सोशिकपणा नव्हे, हेच आधी लक्षात घेऊयात.