मुंबई – मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा. मराठी भाषेचा जागर व्हावा यासाठी पुस्तकाचं गाव उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये राज्यात एकच पुस्तकाचं गाव का असावे? असे नमूद करून तळा गाळातील मराठी भाषा, तिच्या वैशिष्ट्यांसह सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करतो. मग मराठी भाषेचा विकास तिथपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले जातील. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक पुस्तकाचे गाव असायला हवे. त्यासाठी पुढील मराठी भाषा गौरव दिनापूर्वी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक गाव पुस्तकांचे गाव असेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मराठी भाषा दिनानिमित्ताने मराठी भाषा विभागाचे विविध पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
आज मान्यवरांना देण्यात येणारा हा केवळ पुरस्कार नसून मराठी भाषेची सेवा केल्याबद्दल आणि अक्षरधनाची जपणूक केल्याबद्दल ऋण व्यक्त केले जात आहेत. साहित्यिक केवळ लेखन करत नाहीत. तर ते आयुष्याची गाडी रुळावर ठेवत असतात, असेही ते म्हणाले.
“पुस्तकांचे गाव योजने’चा होणार विस्तार: अक्षरयात्रा
पस्तीस दालनांमध्ये विविध साहित्यप्रकारांची सुमारे पस्तीस हजार पुस्तके असणारे भिलार हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव. राज्य मराठी विकास संस्थेकडून ही योजना “पुस्तकांचं गाव विस्तार योजना : अक्षरयात्रा’ या नावाने विस्तारण्यात येत आहे. थिबा पॅलेस, रत्नागिरी येथील प्रादेशिक संग्रहालय, ग्रामपंचायत अंकलखोप, जिल्हा सांगली येथील कृष्णाकाठचा श्री दत्तमंदिराचा परिसर औदुंबर, निफाड तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळगाव (बसवंत), वर्णमुद्रा प्रकाशन शेगाव, बुलढाणा या ठिकाणी ही योजना राबवली जाणार आहे.