नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सगळ्यांना लुबाडण्यात आले. कोणीही त्यातून वाचलेले नाही. केवळ त्यांच्या दोन उद्योगपती मित्रांचाच या काळात फायदा झाला आहे, अशी टीका आम आदमी पक्षाचे नेते खासदार संजय सिंह यांनी केली आहे.
संजय सिंह म्हणाले की या सरकारच्या काळात शेतकरी अस्वस्थ आहेत, बेरोजगार युवक अस्वस्थ आहेत, सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे कारण सरकारने सगळ्यांना फसवण्याचेच काम केले आहे. मात्र केवळ त्यांच्या अदानी आणि अंबानी या मित्रांचाच फायदा झाला आहे.
जात, धर्म, प्रांत या आधारावर देशातील युवकांमध्ये फूट पाडण्याचे काम सरकारने बंद करावे, युवकांना रोजगार द्यावा, सरकारी कंपन्यांची विक्री करण्याचे धोरण तात्काळ थांबवावे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ते पुढे म्हणाले की दिल्लीतील शेतकरी आंदोलनात देशाचा अन्नदाता शहिद होतो आहे. मात्र त्याचा आवाज ऐकायला कोणी तयार नाही. मोदी सरकार, प्रसारमाध्यमे आणि बोगस सेलेब्रीटी अशा कोणालाही शेतकऱ्यांचा वेदना समजत नाही. शिक्षणमित्रांना आत्महत्या कराव्या लागत आहेत.
अंगणवाडी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला जाते आहे. बेरोजगार नोकरीच्या शोधात धक्के खात फिरत आहेत. अर्ज भरून भरून ते कंटाळले आहेत. मात्र मोदी सरकार रेल्वे, क्रीडा, सेल, बॅंक, एलआयसी, वीज, पाणी, रस्ते असे सगळे विकण्याच्या तयारीत बसले आहे.