यवत – दौंड तालुक्यातील यवत हद्दीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर- ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.17) दुपारी घडली. अतुल आप्पा कारंडे, असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. इनोव्हा चालकाने डीझेलचे 500 रुपये कमी दिल्यामुळे ही रक्कम आणण्यासाठी गेलेल्या अतुलने जीव गमावल्याची चर्चा आहे.
कारंडे हा जावजी बुवाचीवाडी जवळील रिलायन्स पेट्रोल पंपावर काम करत होता. दुपारी इनोव्हा गाडी डीझेल भरण्यासाठी पंपावर आली होता. त्यावेळी चालकाने 3,460 रुपयांचे डिझेल भरले. चालकाने पैसे देताना 500 रुपये कमी देत तो सोलापूरकडे निघून गेला.
यानंतर 500 रुपये कमी दिल्याचे लक्षात आल्याने कारंडे हा दुचाकीवर एकटा व दुसऱ्या दुचाकीवर सागर कोल्हे व वैभव ओहळ, असे दोन दुचाकीवर हे तिघेजण गाडीचा पाठलाग करत होते.
दरम्यान, कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर वळत असताना कारंडे याचे नियंत्रण सुटून दुचाकीची ट्रॉलीला धडक बसली. यात कारंडे याचा जागीच मृत्यू झाला.