नवी दिल्ली – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार वादग्रस्त ठरलेल्या केंद्रीय कृषी कायद्यांवरून मोदी सरकारच्या पाठिशी उभे राहिले आहेत. संबंधित कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. त्यावरून निर्माण झालेल्या कोंडीवर लवकरच तोडगा निघण्याची आशा वाटते, अशी भूमिका त्यांनी मांडली.
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये नितीश यांनी मुख्यमंत्रिपदाची सुत्रे पुन्हा स्वीकारली. त्यानंतर त्यांनी प्रथमच देशाच्या राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नितीश यांनी कृषी कायद्यांचे समर्थन केले.
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांशी चर्चेचा योग्य मार्ग मोदी सरकारने स्वीकारला असल्याचेही त्यांनी म्हटले. मोदींशी झालेल्या चर्चेचा तपशील नितीश यांनी सांगितला नाही. आमची भेट सदिच्छा स्वरूपाची होती. कुठली मागणी मांडण्यासाठी मी मोदींची भेट घेतली नाही. विविध मुद्द्यांवर आमच्यात चर्चा झाली, असे त्रोटक उत्तर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर दिले.