मुंबई : भारतीय जनता पक्षात खासदार असताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारणारे नाना पटोले नुकतेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पटोले प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाले. नव्या भूमिकेत येताच पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीएसटीवरून विचारणा केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रस्तावित केलेला वस्तू आणि सेवा कर कायदा (GST) पंतप्रधान मोदी यांनी जशाचा तसा का मंजूर केला नाही, अशी विचारणा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एकच कृषी उत्पन्न बाजार समिती असावी, असे म्हटले होते, याचा हवाला दिला. त्यावरून नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली
देशात लागू करण्यात आल्याले कृषी कायद्याचे समर्थन करताना पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे उदाहरण दिले. असे असेल, तर मग मनमोहन सिंग यांनी आणलेला जीएसटी कायदा जशास तसा स्वीकारला का नाही, अशी विचारणा करत पंतप्रधान मोदी खोटे बोलत असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली.