अलाहाबाद – अल्पवयीन मुलीने तिच्या संमतीने विवाह केला असला तरी ती तिच्या पतीकडे राहू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायलयाने दिला.
त्याचवेळी ती सज्ञान झाल्यानंतर तीने हा विवाह पुढे टिकवायचा की वेगळे होऊन तिला आवडेल त्याच्या सोबत आयुष्य व्यतीत करायचे याचा निर्णय घेण्याचे तिला स्वातंत्र्य आहे, असे या खंडपीठाने स्पष्ट केले.
या मुलीला तिच्या पतीसमवेत राहण्याची मुभा देणारा निर्णय हापूर न्यायालयाने दिला होता. त्याविरोधात या मुलीच्या वडीलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. हापुर येथील पिंटू नामक व्यक्तीने तिच्याशी विवाह केला त्यावेळी तिचे वय 16 असल्याचे वकिलांनी न्यायलयाच्या निदर्शनास आणून दिले.
या वेळी न्यायालयात उपस्थित असणाऱ्या मुलीने आपण स्वत:च्या इच्छेने पिंटूशी विवाह केला आणि आपल्याला आपल्या पालकांसोबत रहायचे नसल्याचे सांगितले. कायद्यानुशार हा विवाह बेकायदा आहे. त्यामुळे सज्ञान झाल्यावर या मुलीने स्वत: ठरवावे की हा विवाह कायम ठेवायचा कि पर्याय निवडायचा.
राज्य सरकारने ती सज्ञान होईपर्यंत तिच्या निवासाची व्यवस्था करावी. हापूरच्या जिल्हा न्यायाधिशांनी महिला न्यायिक अधिकाऱ्याची नियुक्ती करून तिची दर महिन्याला ख्याली खुशाली विचारावी.