नवी दिल्ली – देशात सोमवारी विजेची विक्रमी मागणी नोंदवली गेली आहे. आजच्या दिवशी एकूण 185.82 गिगावॅट्स इतकी मागणी नोंदवली गेली असल्याची माहिती ऊर्जा सचिव एस. एन. सहाय यांनी दिली. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सतत वाढ होत असून आज सोमवारी त्यात सर्वोच्च वाढ नोंदवली गेली आहे.
या आधी 30 डिसेंबर रोजी 182.89 गिगावॅटसची मागणी नोंदवली गेली होती. ती आजवरची सर्वात विक्रमी मागणी म्हणून गणली गेली होती. आज तो विक्रमही मागे पडला असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, देशाचे अर्थचक्र पुन्हा गतीने सुरू झाल्याचेच संकेत यातून मिळत आहेत.
व्यापारी आस्थापना आणि औद्योगिक प्रकल्पांमध्ये विजेचा वापर वाढला असून हे एक चांगले लक्षण मानले जाते, असे ते म्हणाले. करोना लॉकडाऊन काळात एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यात सर्वात नीचांकी विजेची मागणी नोंदवली गेली होती. तथापि सप्टेंबर नंतर मात्र विजेच्या मागणीत हळूहळू वाढ होत गेली आहे.