नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सरपंचपदांची आरक्षण सोडत 27 व 28 जानेवारीला होणार आहेत. याबाबतच्या अधिकृत कार्यक्रमास जिल्हाधिकार्यांची मान्यता मिळाल्यावर तत्काळ जाहीर केला जाईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात 767 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पैकी 705 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान झाले. 5 हजार 788 जागांसाठी 13 हजार 194 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. जिल्ह्यातील 767 पौकी 53 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर 705 ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मात्र सरपंच कोण होणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
अनेक ग्रामपंचायतींमध्ये पूर्ण पॅनेल, तर काही गावांत दोन्ही गटांना विभागून जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्या गावात आरक्षणानंतरच कोणत्या गटाचा उमेदवार सरपंच होणार, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आरक्षण कार्यक्रम आज जाहीर होईल. तसेच आरक्षण कसे असेल, त्याची रूपरेषाही स्पष्ट होणार आहे, असे ही त्या म्हणाल्या.