पाचगणी (प्रतिनिधी) – महाबळेश्वर शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने सन 2020-21 च्या अर्थसकल्पात 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत महाबळेश्वर नगरपालिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला; परंतु या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करून तो महाबळेश्वरला मिळवून देण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या आ. मकरंद पाटील यांचे नाव या अभिनंदनाच्या ठरावातून वगळण्यात आले आहे. आ. पाटील यांना पालिकेने डावलल्याने महाबळेश्वरच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेने विशेष सभेचे आयोजन करून शहर विकासासाठी 100 कोटी रुपये दिल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे अभिनंदन या ठरावात करण्यात आले आहे; परंतु या निधीत मोठे योगदान देणाऱ्या आ. पाटील यांचे नाव वगळल्याची माहिती समोर आल्याने महाबळेश्वरमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे.
आ. मकरंद पाटील यांचे महाबळेश्वरकडे सदैव लक्ष असते. विकासकामांचा डोंगर उभा करताना, महाबळेश्वर पालिकेचे अनेक प्रश्न, घोडे व्यवसायिक, टॅक्सीचालक यांचे प्रश्न ते नेहमी मार्गी लावतात; परंतु महाबळेश्वर पालिकेत गेल्या काही दिवसांपासून राजकारण पेटले आहे.
उपनगराध्यक्ष अफझल सुतार यांच्या माध्यमातून पालिकेत मकरंद पाटील यांच्या विचारांच्या नगसेवकांचा गड राखला गेला आहे. अभिनंदन ठरावावर सूचक म्हणून कुमार शिंदे व अनुमोदक म्हणून युसूफ शेख यांचे नाव आहे. या ठरावातून आ. पाटील यांचे नाव वगळे गेल्याने राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत. आ. पाटील यांच्या विचारांचे 12 नगरसेवक असतानाही आमदारांचेच नाव अभिनंदनाच्या ठरावातून वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या 100 कोटींच्या निधीचा पालिकेने आ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वापर करावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितले असतानाही अभिनंदन ठरावात आ. मकरंद पाटील यांचेच नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या गटाचे नगरसेवक कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.