सातारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यावरून भाजप खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. ‘ते लोकांमध्ये फिरताहेत हे चांगल आहे, ते माझे चांगले मित्र आहेत, त्यांनी फिरलेच पाहिजे, पण लोकांना फिरवू नये, असा उपरोधिक टोला उदयनराजे यांनी लगावला. ते साताऱ्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
उदयनराजे यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशी राजकिय वर्तुळात चर्चा आहे. याबाबत त्यांना विचारले असता उदयनराजे म्हणाले, माझं मंत्रिमंडळ मीच निवडतो, कोणीही मला मंत्री करू शकत नाही. माझे मित्रच मंत्रिमंडळ आहे आणि तेच माझे कॅबिनेट आहे, अशी मिश्कील टिपण्णी त्यांनी केली.
औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले, लोकशाहीत जनता राजे आहेत, त्यामुळे याबाबत तेच निर्णय घेतील. राजेशाही असती तर मी निर्णय घेतला असता. ज्याप्रमाणे बाॅम्बेचं मुंबई झालं तसं लोकं निर्णय घेतील, असेही उदयनराजे म्हणाले.