-ह.भ.प. गणेश म. कदम
देखा नवल तया प्रभुचे । अद्भुत प्रेम भक्ताचे ।
जे सारथ्यपण पार्थाचे । करित असे ।।
मानवी जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्य प्रेम करतो. परंतु प्रत्येकाच्या प्रेमाचे स्वरूप वेगवेगळे असते. त्या प्रेमामध्ये कधीही धोका मिळत नाही ते प्रेम म्हणजे ईश्वरी प्रेम होय. प्रेमामध्ये एक अद्भुत शक्ती आहे. या प्रेमाच्या जोरावर मनुष्य भगवंताला ऋणी करून ठेवू शकतो.
चोखामेळ्याची करणी ।
देव केला त्याने ऋणी ।।
हेच वर्णन करताना माऊली श्री ज्ञानोबाराय सांगतात की, त्या भगवान परमात्म्याचे नवल पाहा की, तो अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत आहे. कारण प्रेमामुळे आपण भगवंताला जिकडे नेऊ तिकडे तो जातो.
प्रेम सुत्र दोरी ।
नतो तिकडे जातो हरि ।।