मुंबई – काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलानंतर कोकणासह मध्य महाराष्ट्रात आज पावसाने काही ठिकाणी तुरळक हजेरी लावली. तसेच रायगड, कर्जत-खालापूरसह खोपोलीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर जोरदार पावसाला सुरूवात झाली. या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांसह परिसरातील वीटभट्टीधारकांना देखील बसला आहे.
दक्षिण-मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण आहे. मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
याशिवाय, मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, मागील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात काही ठिकाणी हलक्या सरींची नोंद झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत पावसाळी स्थिती राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात 8 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.