-गणेश म. भा. फड
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।।
हरिपाठातील पहिल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज मुखाने हरि म्हणा, मुखाने हरि म्हणा असें द्विरूक्ती करून मोठ्या कळकळीनें सर्वांना सांगतात. असे केल्याने काय होईल तर ज्याचे मोजमाप करता येणार नाही असे अगणित पुण्य निर्माण होईल.
माऊली या चरणामध्ये “हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा’ या म्हणण्यातून या ग्रंथाचा विषय सांगतात. या ग्रंथाचे नाव “हरिपाठ’ आहे, यावरून या ग्रंथाचा विषय हरिचे स्मरण आहे हे उघडच आहे.
शिवाय संत ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा पुढे चालवणाऱ्या वारकरी संप्रदायात हरिपाठ म्हणताना प्रत्येक अभंगाच्या शेवटी “हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।। असे म्हणण्याची रीत आहे.
हरिपाठात एकूण सत्तावीस अभंग आहेत. या सर्व अभंगास वेगळे धृवपद नाही. सर्व अभंगांचे हे एकच धृवपद समजले जाते.