उल्हास पवार : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव जोशी यांच्या हस्ते ध्वजवंदन
पुणे – कॉंग्रेसची 135 वर्षांची वाटचाल ही अविस्मरणीय असून, पक्षाचे योगदान देश कधीही विसरू शकत नाही, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी सोमवारी व्यक्त केले.
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा 135 वा वर्धापन दिन पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी कॉंग्रेस भवन येथे साजरा करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव जोशी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी “ऐतिहासिक कॉंग्रेस भवनची निर्मिती’ या पुस्तिकेचे प्रकाशन पवारांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, रोहित टिळक, चिटणीस संजय बालगुडे, माजी आमदार दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, दत्ता बहिरट, अंजनी निम्हण, अनिल सोंडकर, लता राजगुरू, मनीष आनंद, वैशाली मराठे, बाळासाहेब दाभेकर, वीरेंद्र किराड, दीपक रामनानी आदी उपस्थित होते.
या ऐतिहासिक कॉंग्रेस भवनच्या उभारणीला केशवराव जेधे, शंकरराव मोरे आणि काकासाहेब गाडगीळ यांनी पुढाकार घेतला. 1934 च्या कॉंग्रेसच्या अधिवेशनामध्ये सर्व जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाचे कार्यालय उभारावे, असा ठराव केला. त्यानुसार या ऐतिहासिक कॉंग्रेस भवनची निर्मिती झाल्याचा इतिहास पवार यांनी यावेळी सांगितला.
लोकमान्य टिळकांवर ब्रिटीशांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे ते कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष होऊ शकले नाही. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत केलेले योगदान कॉंग्रेस आणि देश कधीही विसरू शकत नाही. महात्मा गांधींनी टिळकांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करावे असा ठराव कॉंग्रेसच्या बैठकीमध्ये मांडला आणि महाराष्ट्र टिळक विद्यापीठाची निर्मिती झाल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले.
या ऐतिहासिक वास्तूत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, आचार्य विनोबा भावे, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांनी भेट दिली आहे. कॉंग्रेसची 135 वर्षांची वाटचाल ही अविस्मरणीय आहे, असे पवार यांनी नमूद केले.
गेल्या 135 वर्षांत कॉंग्रेस पक्षाने जनतेच्या हितासाठी आणि देशाच्या विकासासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. स्वातंत्र्याच्या चळवळीत दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक, मोतीलाल नेहरू, महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू यांसह असंख्य कॉंग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. काहींनी प्राणांची आहुती दिली. पहिले पंतप्रधान पंडित नेहरुंनी पुरोगामी विचाराने देशाचा विकास केला. कॉंग्रेस पक्षाने धर्मनिरपेक्ष धोरण राबवून समाजातील सर्व घटकांना आपल्या कार्यात समाविष्ट करून घेतले, असे बागवे म्हणाले.
आजच्या परिस्थितीत काही धर्मांध शक्ती जनतेत तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे, अशी टीका करत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रवृत्तींविरुद्ध लढा दिला पाहिजे आणि देश एकसंघ ठेवला पाहिजे असे पक्षाचे ध्येय आहे, असे बागवे यांनी नमूद केले. कॉंग्रेस भवनच्या उद्घाटनावेळचा इतिहास नगरसेवक अजित दरेकर यांनी सांगितला.