हरभऱ्याची भाजी खोडण्यासाठी महिलांची लगबग
टाकवे बुद्रुक – आज तुझ्या शेतात भाजी खोडण्यासाठी जाऊ आणि उद्या माझ्या शेतात जाऊ असं शेजारच्या महिलेला बोलून भाजीसाठी (उगवलेल्या हरभऱ्याच्या रोपांचे कोवळे शेंडे खोडण्यासाठी) नाणे मावळ भागातील महिलांची शिवारात लगबग पाहावयास मिळत आहे. घरी बनवली जाणारी चविष्ट आणि रुचकर, थोडीशी आंबट व थोडीशी तुरट भाजी आणण्यासाठी महिला शिवारात गर्दी करू लागल्या आहेत.
डिसेंबर महिना हा शेतकऱ्यांसाठी रब्बी पिकांपासून मिळणाऱ्या भाजीचा हंगाम असतो. भातकाढणी झाली की हरभऱ्याची, पावटा वालाची व गावरान वाट्याण्याची पेरणी केली जाते. साधरणतः तीन आठवड्यानंतर हरभऱ्याच्या रोपांची बऱ्यापैकी वाढ होते. त्यावेळी ग्रामीण भागातील महिला हरभऱ्याच्या कोवळ्या शेंड्यांचा वापर भाजी बनवण्यासाठी करतात. शेंडे तोडण्यालायक रोपे दिसू लागली की महिला शेतावर भाजी खोडताना दिसू लागतात.
डिसेंबर महिन्यात सायंकाळच्या वेळी बनवलेल्या अत्यंत चविष्ट आणि रुचकर, थोडीशी आंबट व थोडीशी तुरट असा स्वाद असलेल्या भाजीचा सुगंध ग्रामीण भागात घरोघरी दरवळला जातो. गरमागरम भाजीसोबत चुलीतील निखाऱ्यावर भाजलेल्या तांदळाच्या भाकरीचा आस्वाद ग्रामीण भागातील नागरिक घेतात तसेच शेंडे तोडल्यानंतर शिवारातील हरभऱ्याच्या रोपनांही अनेक फांद्या फुटतात त्यामुळे हरभरा बियाणात वाढ होऊन शेतकऱ्यांनाही भरघोस उत्पादन मिळते.
हरभऱ्याच्या भाजीचा हंगाम संपत नाही तर त्याअगोदर लगेचच कोवळे गावरान वाटणे व वालाच्या शेंगा भाजीसाठी तयार होतात. गावरान कोवळ्या वाटण्याचा व पावटा वालाचा वापर वापर ग्रामीण भागातील महिला मसालेभातासाठीही करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील गृहिणींना डिसेंबर व जानेवारी महिन्यात जास्त भाज्यांची कमतरता भासत नाही. “शेजारच्या दोन-तीन महिलांबरोबर जायचं. दोन-तीन वेळेची भाजी तोडून आणायची. भाजी साफ करून धुवायची. तव्यात तेल टाकून कुटलेल्या हिरव्या मिरच्या व लसूण टाकून तडका द्यायचा आणि भाजीबरोबर मीठ टाकून भाजी शिजवून घ्यायाची. गरमागरम भाजीबरोबर निखाऱ्यावर भाजलेल्या तांदळाची भाकरीची चव खूपच छान लागते’, असे साई गावाच्या गृहिणी रखमा पिंगळे यांनी सांगितले.
“हरभऱ्याची रोपे पूर्णतः मोठी झाली की, हरभरा फुलोऱ्यावर येतो. तेव्हा कोवळे शेंडे राहत नाही. मग त्याअगोदरच आम्ही भाजी खोडून आणून वाळवून ठेवतो. भाजी वाळल्यानंतर तिला कुटून आणतो. आणि ती भाजी हरभऱ्याच्या डाळीबरोबर वर्षभरात केव्हाही बनवतो. त्या भाजीस हरभऱ्याची हाटीव भाजी बोलतात’ असे साई गावच्या गृहिणी बायडा पिंगळे यांनी सांगितले.