नवी दिल्ली – मागण्यांसाठी शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ आल्यावरून कॉंग्रेसने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. अन्नदात्यांचे उपोषण हेच का अच्छे दिन, असा सवाल कॉंग्रेसकडून करण्यात आला.
संपूर्ण देशाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांवर 73 वर्षांत पहिल्यांदाच उपोषण करण्याची वेळ आली. मोदी सरकारने निवडणुकांत पैसा पुरवणाऱ्यांचा हात सोडून शेतकऱ्यांचा हात हाती घ्यावा. शेतकऱ्यांचे अश्रू पुसून सरकारने त्यांची माफी मागावी.
तसेच, तिन्ही काळे कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी ट्विटरवरून केली. कॉंग्रेसच्या आणखी काही नेत्यांनी सोशल मीडियावरून सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांच्या प्रत्येक कलमावर चर्चा करावी, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षांनी प्रत्येक कलमावर चर्चेची मागणी सप्टेंबरमध्येच केली होती. त्यावेळी सरकारने संसदीय समितीला तसे का करू दिले नाही? आता सरकार त्याविषयी दाखवत असलेली तयारी हास्यास्पद आहे, असे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटले.
तर, शेतकरी आंदोलनाचा गैरफायदा उठवण्याचा तुकडे-तुकडे गॅंगचा प्रयत्न असल्याच्या केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्याचा आणखी एक नेते मनिष तिवारी यांनी समाचार घेतला. सरकारने आधी शेतकऱ्यांना खलिस्तानी, पाकिस्तानी आणि दहशतवादी म्हटले. आता त्यांना तुकडे-तुकडे गॅंग म्हटले जात आहे, अशी टिप्पणी तिवारी यांनी केली.