सातारा -राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची परीक्षा चांगल्या मार्गाने उत्तीर्ण केल्याने आघाडीतील तिन्ही पक्षांना नवा जोश मिळाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या रणनीतीने भाजपला अस्मान दाखविले. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विजयात पवारांचा “अदृश्य हात’ महत्त्वाचा ठरला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी हा विजय म्हणजे महाविकास आघाडी व राष्ट्रवादीसाठी बूस्टर डोस ठरला आहे. त्यामुळेच सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने मोर्चेबांधणीला आतापासून सुरुवात केली आहे.
आगामी वर्ष राजकीय घडामोडींचे राहणार आहे. सातारा जिल्ह्यातील पालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला पवारांच्या “अदृश्य हाता’ची करामत गरजेची ठरणार आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये सहज बाजी मारू, या भ्रमाचा भोपळा फुटल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजपने सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख यांना दिलेली उमेदवारी पक्षनेतृत्वाच्या अंगलट आली. पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीचा जबर फटका भाजपला बसला.
सातारा जिल्ह्यात मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपने जोर लावूनही फारसा फरक पडला नाही. कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवत भाजपला नामोहरम केले. स्वतः शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोअर टीममधील नेत्यांना पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची निवडणूक गांभीर्याने घेण्याची सूचना केली होती. परिणामी राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्राबरोबर रा. स्व. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्येही भाजपला धोबीपछाड दिली.
या धवल यशामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच “रिचार्ज’ झाले आहेत.
पुढील वर्षी एप्रिल ते डिसेंबर या काळात 879 ग्रामपंचायतींच्या तर डिसेंबरमध्ये नऊ नगर परिषदा व आठ नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षाचा उत्तरार्ध राजकीय घडामोडींचा ठरणार आहे. पुढील महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामध्ये याच विषयावर खलबते होणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याची जवाबदारी त्या त्या मतदारसंघांमधील आमदारांवर टाकण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी हाच फॉर्म्युला वापरला जाणार का? शरद पवार काय भूमिका मांडणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यावर निर्विवाद मांड ठोकण्यासाठी राष्ट्रवादीने पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन, कॉंग्रेसचा एक, शिवसेनेचे दोन व भाजपचे दोन आमदार आहेत. जिल्ह्यातील निवडणुका होणाऱ्या सर्वाधिक 133 ग्रामपंचायती सातारा तालुक्यातील आहेत. त्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटांचे वर्चस्व आहे. पर्यायाने हा तालुका आता भाजपचा बालेकिल्ला आहे. याशिवाय जिल्ह्यातील सातारा ही एकमेव “अ’ वर्ग नगर परिषद आहे. ही पालिका भाजप व राष्ट्रवादी यांच्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र राहणार आहे. आगामी पालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढविण्याची भीमगर्जना आ. शशिकांत शिंदे यांनी केली आहे. मराठा आरक्षणावरून खा. उदयनराजे व आ. शशिकांत शिंदे यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्याची चर्चा सध्या आहे. उदयनराजेंच्या ताब्यातील सातारा नगर परिषद खेचून घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शर्थीचे प्रयत्न करणार, यात शंका नाही. शरद पवारांनी या निवडणुकांमध्येसुद्धा लक्ष घालावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाळगून आहेत.