मंगेश पाटे
खोडद – जिल्ह्यातील 1408 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत येत्या 8 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर नव्याने मतदारयाद्या आणि प्रारुप आराखडा जाहीर केला जाणार आहे. यानंतर प्रत्यक्ष निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल; मात्र याआधीच राजकीय धुरीणांना आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. दिवाळीत फराळवाटप करून “मीच सरपंच’ या अविर्भावात अनेकजण वावरताना दिसत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच गावनेत्यांनी जोरबैठका सुरू केल्या आहेत. आपले पैलवान ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात उतरवायचे असून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासठी तोंडावर हास्य करीत आपल्या बाजूने भावकी, सर्वसामान्य माणूस कसा राहील, याची खेळी करण्याचा प्रयत्न गावपुढाऱ्यांनी सुरु केला आहे. प्रत्येक गावोगावी गटा-तटाच्या राजकारणाचे ग्रहण लागल्यामुळे “एकात एक नाही आणि बापात लेक नाही’, अशी परिस्थिती बहुतांश गावांमध्ये आहे.
एकमेकांचे पाय ओढणाऱ्यांच्या राजकारणामुळे अनेक गावे विकासापासून दूर राहिली आहेत. याचा फायदा घेत काही नेते मंडळी आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न या निवडणुकीत करत आहेत. गावात दुफळी माजवत आहेत. यामुळे गावामध्ये गट-तट निर्माण होत असल्याचा सूर जाणकार नागरिकांमधून येत आहे.
सध्या ग्रामीण भागात औद्योगिकीकरण वाढल्याने, तसेच अनेक गावांमधून महामार्ग गेल्यामुळे जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. या जमिनी करोडो रुपयांना विकून अनेकांच्या खिशात बक्कळ पैसा खुळखुळू लागला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतसारखी मानाची पदे मिळवण्यासाठी अनेक गावांमध्ये शर्यत सुरु झाली आहे. निवडणुकीच्या काळात तरुण मुलांना व्यसनाच्या आहारी लावून तरुण पिढी देशोधडीला लावण्याचे कामही काही राजकीय गावपुढारी करत असल्याचा आरोप गावागावातील सुज्ञ नागरिक करीत आहेत.
एकंदरीत यंदाची ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच गाजणार असून, इच्छुक उमेदवारांनी गुडग्याला बाशिंग बांधून नुकत्याच झालेल्या दिवाळीला स्वतःचे मोठमोठे फोटो असणारे फ्लेक्स चौकाचौकात उभे करून गाजा वाजा करत काही गरीब, अनाथ लोकांना दिवाळी भेट देण्यास सुरुवात करून “मीच सरपंच होणार’ या रुबाबात वावरू लागले आहेत.
प्रतिष्ठा पणाला…
यापूर्वी गावकारभारी सर्वांना एकत्र घेऊन गावची बैठक बोलवून सर्वानुमते सरपंच, उपसरपंच व सदस्य निवडत असे व हा निर्णय गावकरीही मान्य करत असत; मात्र 20 ते 25 वर्षांपासून आपल्या राजकीय पक्षाचे वर्चस्व रहावे, गाव आपल्या ताब्यात राहावा म्हणून, सर्व पक्ष आपली ताकद या ग्रामपंचायत निवडणुकीत पणाला लावत आहेत. जिल्हा आणि तालुकास्तरीय नेते राजकीय खेळी करून ही निवडणूक प्रतिष्ठेची करत आहेत.