पुणे – महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण व नोकरी प्रवेश प्रक्रियेत डावलून इतरांसाठी प्रक्रिया सुरु केल्याप्रकरणी मराठा समाज अस्वस्थ आहे. त्यातच महावितरणमध्ये एसईबीसी आरंक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांचा समावेश वगळून इतर भरती प्रक्रिया शटर बंद करून राबविली जात आहे. या नियमबाह्य भरतीसाठी होत असलेली पडताळणी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाच्या माध्यमातून आज उधळून लावली.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता पेठ (पॉवर हाऊस) येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता कार्यालयावर अर्ज केलेले उमेदवार, त्यांचे कुटुंबिय आणि मोर्चाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, विकास पासलकर, राजेंद्र कुंजीर, बाळासाहेब आमराळे, रघुनाथ चित्रे पाटील, तुषार काकडे, युवराज दिसले, अमर पवार, किशोर मोरे, सचिन आडेकर, श्रृतिका पाडळे, सचिन पवार, आश्विनी खाडे, महेश यादव, अनिल मारणे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
महावितरणने भरतीमध्ये मराठा एसईबीसी आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना समाविष्ट केलेले नाही. तसेच, शासनाने दिलेले आश्वासन पाळले नसल्याने सदर भरती करू नये, शासनाच्या पुढील आदेशापर्यंत एसईबीसी आरक्षणांतर्गत अर्ज असलेल्या उमदेवारांची त्वरीत करावी, अशी मागणी ही मोर्चाच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महावितरणचे अधीक्षक अभियंता (पुग्रामं) राजेंद्र विष्णू पवार आणि अधीक्षक अभियंता (रापेशमं) प्रकाश राऊत यांना निवेदन देण्यात आले.
विकास पासलकर म्हणाले की, सरकारने महावितरणमध्ये भरती करीत असताना सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना डावलून पडताळणी प्रक्रिया सुरु ठेवली आहे. सदरची प्रक्रिया शटर बंद करुन केली जात असून या घटनेचा आणि सरकारचा मराठा क्रांती मोर्चा निषेध करीत आहे. सरकारने त्वरीत सर्वच विद्यार्थ्यांना समान न्याय देऊन ही भरती प्रक्रिया एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसह पूर्ण करावी.
बाळासाहेब आमराळे म्हणाले की, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण बरोबरच विद्यार्थ्यांच्या प्रवेशासह नोकर भरतीसाठी सरकारशी वेळोवेळी संपर्क करीत आहे. परंतु, अशा पद्धतीने महावितरणमधील भरती प्रक्रियेचा जाहीर निषेध करीत आहोत. शासनाने ही भरती स्थगित करुन एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ही त्यामध्ये समाविष्ट करुन भरती प्रक्रिया पूर्ण करावी.
महावितरण उपकेंद्र सहाय्यक पदासाठी शासनाने 28 जून रोजी यादी प्रसिद्ध केली. त्याच वेळी कागदपत्रांची पडताळणी व नियुक्त्या होणे अपेक्षित होते. मात्र, एसईबीसी विद्यार्थ्यांना वगळून दि. 2 डिसेंबरला शटर बंद करुन पडताळणी चालू होती. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ही पडताळणी बंद पाडली आहे.
– रघुनाथ चित्रे पाटील, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा