30 खेळाडू परत करणार पदके
नवी दिल्ली – केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आता खेळाडूही एकवटले आहेत. जवळपास 30 खेळाडूंनी या कायद्याचा निषेध व्यक्त करत आपापली पदके परत करण्याचा इशारा दिला आहे.
याचबाबत शेतकऱ्यांना पाठिंबा देत अनेक माजी खेळाडूंनी जिंकलेली पदके परत करण्याचे संकेत दिले आहेत. भारताचे माजी बास्केटबॉलपटू व अर्जुन पुरस्कार विजेते सज्जन सिंग चीमा हे या खेळाडूंचे प्रतिनिधीत्व करत आहेत. चीमा यांच्या या आवाहनाला चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. चीमा यांना पाठिंबा देत जवळपास 30 खेळाडूंनी पदके परत करण्याचे ठरवले आहे.
त्यात गुरमेल सिंग, सुरिंदर सिंग सोढी हे 1980 सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या भारताच्या हॉकीच्या संघाचे सदस्य होते. पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू करतार सिंग, महिला हॉकीपटू राजबीर कौर यांच्यासह एकूण 30 खेळाडू पदके परत करणार आहेत.
यासाठी त्यांनी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी वेळ मागिलती आहे. जर त्यांना वेळ दिली नाही तर हे खेळाडू 5 डिसेंबर रोजी आपले पुरस्कार व पदके राष्ट्रपती भवनाबाहेर ठेवणार आहेत.