मुंबई – महाराष्ट्रात आम्ही काहीही घेण्यासाठी आलेलो नाही. आम्ही आमच्या राज्यात नवीन फिल्मसिटी उभारणार असून बॉलिवूड हे मुंबईतच राहणार आहे. उत्तर प्रदेशात आम्हाला वर्ल्ड क्लास फिल्मसिटी निर्माण करायची आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगले होते. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना योगी आदित्यनाथ यांनी आपले मत मांडले.
योगी आदित्यनाथ म्हणाले, कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. ही काय पर्स आहे का? की ती कुणीही घेऊन निघून जाईल. ही खुली स्पर्धा आहे. सुरक्षा देण्याची, सामाजिक सुरक्षा देण्याची, कुणासोबत भेदभाव न करता चांगलं वातावरण देण्याची गरज आहे. ती प्रत्येकाने दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मुंबई फिल्मसिटी आपले काम करेल. यूपीतील नवी फिल्मसिटी त्यांचे काम करेल, असेही ते म्हणाले.
बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवे मॉडल तयार करायचे आहे. वर्डक्लास फिल्मसिटी तयार करण्यासाठी फिल्मी दुनियेच्या लोकांशी चर्चा केली. आम्ही कुणाचं काही घेऊन जाणार नाही. आम्हाला नव निर्मिती करायची आहे. त्यासाठी आलो आहोत, असेही त्यांनी सांगितले.
तसेच कुणाची गुंतवणूक कुणी घेऊन जाणार नाही. कुणालाही बाधा आणायची नाही. भारताची इकनॉमी वाढवायची आहे. मला वाटते हेच सर्वांचेही लक्ष्य असले पाहिजे, असा चिमटाही त्यांनी शिवसेनेला काढला. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 3 लाख कोटीपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील गुंतवणूकदारांशी चांगली चर्चा झाली.
उत्तर प्रदेशात आम्हाला वर्ल्ड क्लास फिल्मसिटी निर्माण करायची आहे. म्हणून व्यक्तिगतरित्या मी अनेकांना भेटलो. काहींशी सामूहिकपणेही चर्चा केली. फिल्मी दुनियेकडूनही आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.