रेडा -लॉकडाऊन काळातील वीज बिल वसुलीचा शासनाने काढलेल्या फतवा जुलमी व अन्यायकारक आहे. राज्यातील जनता व शेतकरी सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याने शासनाने हा फतवा मागे घेऊन लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीचा आदेश तात्काळ काढावा, अशी मागणी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.19) केली.
इंदापूर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज अन्यायकारक वीजबिले जाळून महाआघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, जनतेने ऊर्जा मंत्र्यांकडे लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करण्याबाबत मागणी केली होती. त्याबाबत दिलासादायक निर्णय घेऊ, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. परंतु नंतर ऊर्जामंत्र्यांनी जाहीर केले की, मीटर रिडींगप्रमाणे आलेली वीज बिले माफ होणार नाहीत. त्यानुसार महावितरण कंपनीने वीज बिले वसुलीचा जनतेला तगादा लावला आहे. महाविकास आघाडी सरकारने दिलेले आश्वासन न पाळून राज्यातील ग्राहकांची, उद्योग व्यवसाय करणाऱ्यांची व शेतकऱ्यांची करोनाच्या संकटात फसवणूक केली आहे.
लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय बंद असल्याने वीज बिले कमी यायला हवी होती. परंतु जास्त वीज बिले आकारण्याचे काम कंपनीने केले. लॉकडाऊनमुळे शेतकरी, सामान्य नागरिक, व्यावसायिक, नोकरदार, यांच्यापुढे आर्थिक संकट उभे असल्याने ही बिले ताबडतोब भरू शकणार नाहीत. वाढीव वीज बिल आकारणी, संगणकीय त्रुटी आदी चुका सरकारने केल्या असल्याने जुलमी बिलांची आज राज्यभर होळी करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. शासनाने वीजबिलांची संपूर्ण माफी केल्याशिवाय भाजप गप्प बसणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला.
ते म्हणाले, आज तालुक्यात ट्रान्सफॉर्मर जळाला तर मिळत नाही. सध्या तालुक्यातील 20 ते 25 गावांतील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद आहेत. मंत्री म्हणून आपण मिरवता. परंतु जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. शंभर टक्के वीज बिल माफ करू, संपूर्ण कर्जमाफी करू, मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाचे प्रश्न सोडवू असे आश्वासन या लोकप्रतिनिधींने दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजून भरपाई मिळाली नाहीत. लोकप्रतिनिधी सरकारचे प्रतिनिधी असल्याने त्यांची जबाबदारी आहे.
यावेळी इंदापूर भाजपचे तालुकाध्यक्ष ऍड. शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद, ऍड. कृष्णाजी यादव, पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांची भाषणे झाली. आंदोलनामध्ये इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी महावितरणचे उपअभियंता रघुनाथ गोफणे यांनी पाटील यांच्याकडून वीज बील माफीच्या मागणीचे निवेदन स्वीकारले.