नवी दिल्ली – भारतातील वाहन उद्योगांवर इतर देशांच्या तुलनेत जास्त कर आहेत. त्याचबरोबर इतर देशांच्या तुलनेत भारतातील वाहन उद्योगाला अधिक व्याजदराने भांडवल घ्यावे लागते, असे वाहन उत्पादकांनी म्हटले आहे.
यासंदर्भात फोर्स मोटर्स या पर्यटकांसाठी वाहन तयार करणाऱ्या कंपनीने तपशिलात माहिती जाहीर केली आहे. जोपर्यंत भारतातील वाहन उद्योगावर असलेले कर आणि व्याजदर इतर देशात इतके कमी होणार नाहीत तोपर्यंत भारतातील वाहन उद्योग जागतिक पातळीवर स्पर्धात्मक होणार नाही, असे या कंपनीने म्हटले आहे. जास्त व्याजदराचा आणि कराचा परिणाम परदेशातील भारतात कार्यरत कंपन्यांपेक्षा भारतातील कंपन्यावर अधिक होतो असे या कंपनीचे म्हणणे आहे.
जागतिक पातळीवर वाहन उद्योगात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाल्यामुळे वाहन उद्योगाला नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधन करावे लागते. मात्र व्याज व करामुळे नफा कमी होत असल्यामुळे वाहन कंपन्यांना या क्षेत्रात गुंतवणूक करता येत नाही.
ज्या देशात वाहन उद्योग विकसित झाला आहे. अशा देशातील व्याजदरात आणि भारतातील व्याजदरांमध्ये 6 ते 8 टक्के फरक आहे. त्यामुळे भारतातील उद्योगांच्या नफ्यावर मोठा परिणाम होतो. भारतातील वाहन उद्योग स्पर्धात्मक करायचा असल्यानंतर भारतातील उद्योगासमोरील या दोन मोठ्या अडचणी सोडवण्याची गरज आहे. त्यासाठी दीर्घ पल्ल्याचे धोरण तयार करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
1 कोटीच्या गुंतवणुकीवर मिळतात 10 लाख
भारतात वाहन उद्योगांत 1 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर त्यातून केवळ 10 लाख रुपये मिळतात. त्यातून 28 टक्केपेक्षा जास्त जीएसटी द्यावा लागतो. त्याचबरोबर व्याज द्यावे लागते. त्यामुळे कंपन्यांना फारसा नफा होत नाही असे फोर्स मोटर्स कंपनीने म्हटले आहे. भारतातील वाहन उद्योगास सुटे भाग पुरवण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो या कंपनीने म्हटले आहे.