-राहुल गोखले
जोवर कॉंग्रेस संघटनात्मक बदल करीत नाही, पूर्णवेळ नेतृत्व पक्षाला लाभत नाही, मेहनत घेणारे आणि जमिनीवर काम करणारे नेते आणि कार्यकर्ते यांना पक्षात स्थान मिळत नाही आणि पूर्ववैभवाच्या फसव्या छायेतून पक्ष बाहेर येत नाही तोवर कॉंग्रेसच्या माथी अपयश लिहिले जाणे स्वाभाविक आहे. अनुत्सुक नेत्यांवर किती काळ कॉंग्रेस भिस्त ठेवणार यावर पक्षाची पुढची वाटचाल व पक्षाची प्रासंगिकतादेखील अवलंबून असणार आहे.
काही महिन्यांपूर्वी जेव्हा तेवीस कॉंग्रेस नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून कॉंग्रेसमध्ये त्वरेने संघटनात्मक बदल आणि पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असण्याची निकड प्रतिपादन केली होती तेव्हा त्यावर गांभीर्याने विचार करण्याऐवजी या पत्रलेखक नेत्यांचे पंख कापण्यात आले आणि हे नेते म्हणजे जणू पक्षद्रोहीच आहेत, असे चित्र निर्माण करण्यात आले. आता बिहारमध्ये आणि काही राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये कॉंग्रेसची जी सुमार कामगिरी राहिली आहे त्यानंतर त्या पत्रातील चिंता किती वास्तवदर्शी होती याची जाणीव पक्षाच्या मुखंडांना व्हायला हवी. ज्या नेत्यांनी ती चिंता व्यक्त केली होती केवळ वैयक्तिक लाभाच्या अपेक्षेतून नव्हे. तथापि त्याकडे कानाडोळा करून कॉंग्रेसने स्वतःचे नुकसान करून घेतले आहे याचा प्रत्यय बिहार विधानसभा आणि पोटनिवडणुकांच्या निकालांनी आला आहे. अशीच घसरगुंडी सुरू राहिली तर कॉंग्रेसची प्रासंगिकता काय, असा प्रश्न उपस्थित होईल, अशी वेळ येऊ शकते.
पक्ष आणि संघटना वर्षभर आणि चौवीस तास चालवायच्या असतात. मात्र कॉंग्रेसला तशी गरज तरी वाटत नसावी किंवा सवड तरी नसावी. एरव्ही करोनाच्या गंभीर समस्येने निर्माण झालेले स्थलांतरित मजुरांचे प्रश्न, प्रचंड वाढलेली बेरोजगारी, पूर आणि अतिवृष्टीने हवालदिल झालेले शेतकरी, हाथरससारख्या घडलेल्या घटना, शेतीविषयक कायद्यांचे अनेक राज्यांत उमटलेले प्रतिकूल पडसाद एवढी सामग्री सरकार आणि भाजपच्या विरोधात असतानादेखील कॉंग्रेसला या सामग्रीचा वापर करता आलेला नाही, याचा अर्थ कसा लावणार? बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याविषयी जनतेत कमालीचा रोष होता आणि तेजस्वी यादव यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतलीही होती. मात्र कॉंग्रेसने सत्तर जागा लढवून केवळ एकोणीस जागा जिंकल्या. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकांत कॉंग्रेसने कमी जागा लढवून आताच्या तुलनेत अधिक जागा जिंकल्या होत्या. अर्थात, या सुमार कामगिरीला कॉंग्रेस नेतृत्वाच्या गांभीर्याचा अभाव कारणीभूत आहे, यात शंका नाही. मूळात एवढ्या जागांवर आपला प्रभाव आहे का, याचा विचार पक्षाने केला नाही.
राहुल गांधी यांनी प्रचार अवश्य केला; पण तेजस्वी यांनी केलेल्या प्रचाराला मिळालेला प्रतिसाद राहुल यांना मिळाला नाही. उमेदवार निवडीत देखील नक्की कोणते निकष लावण्यात आले हा संशोधनाचा विषय कारण अनेक उमेदवारांचा स्थानिक संपर्क नव्हता. शरद यादव यांची कन्या आणि शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र यांसारखे कॉंग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. ज्या मुस्लीम उमेदवारांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली ती निवडही चुकली असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण, उमेदवार निवडीपासून प्रचारापर्यंत कॉंग्रेसने सर्वच आघाड्यांवर निष्क्रियता आणि खुशालचेंडूपणा दाखविला. अर्थात याचे खापर कॉंग्रेस उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्यावर फोडून चालणार नाही. नेतृत्वच जर जबाबदारी स्वीकारण्यास आणि गतकाळात झालेल्या गफलती सुधारण्यास तयार नसेल, तर निवडणुका लढविण्याची जिद्द आणि चिकाटी खालपर्यंत कुठून झिरपणार हा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर कॉंग्रेसलाच शोधावे लागेल.
जी बाब बिहारची तीच विविध राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांची. गुजरातपासून मध्यप्रदेशपर्यंत जेथे जेथे पोटनिवडणूक झाली तेथे तेथे कॉंग्रेसला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला आहे. पोटनिवडणूक म्हणजे काही जनमताचा कौल नाही आणि सामान्यतः राज्यात सत्ताधारी असणाऱ्या पक्षालाच पोटनिवडणुकीत विजय मिळतो असा अनुभव असला तरीही भाजप ज्या गांभीर्याने प्रत्येक निवडणुकीकडे पाहतो त्याच्या अंशभर देखील कॉंग्रेस पाहते का, ही शंका यावी अशी स्थिती आहे. मध्यप्रदेशात कॉंग्रेस सरकारला पाडून भाजपने सत्ता काबीज केली ती अर्थातच कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आमदारांच्या झालेल्या पक्षांतराने. साहजिकच त्या जागा रिक्त झाल्या आणि पोटनिवडणूक गरजेची झाली.
कमलनाथ यांनी प्रचार केला हे खरे; पण अनावश्यक वाद ओढवून घेतले. मुख्य म्हणजे ज्या जागा कॉंग्रेसने दीड एक वर्षांपूर्वी जिंकल्या होत्या त्या राखण्यात कॉंग्रेसला यश आले नाही; उलटपक्षी ज्या 19 जागा भाजपने जिंकल्या आहेत त्या सगळ्या कॉंग्रेसकडे होत्या. 28 पैकी निदान निम्म्या जागा तरी कायम राखण्यात कॉंग्रेसला यश आले असते तर त्या पक्षाचा जनाधार टिकून आहे अशी ग्वाही मिळाली असती. गुजरातेत राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी काही आमदारांनी पक्ष सोडला होता आणि त्यामुळे तेथील आठ जागांवर पोटनिवडणूक झाली. तेथे आता भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेले पाच आमदार हे पूर्वाश्रमीच्या कॉंग्रेसचे आहेत. कर्नाटकात आरआर नगर मतदारसंघात भाजपने विजय मिळविला; पण तेथे देखील विजयी उमेदवार हे अगोदर कॉंग्रेसकडून निवडून आलेले होते.
तेव्हा खरे तर पक्षबदलूंना मतदारांची पसंती मिळाली आहे असे पोटनिवडणुकांतून दिसते. मतदार हे राजकीय स्थैर्यासाठी करत असावेत असे समजण्यास वाव आहे. परंतु वास्तविक याचे आत्मचिंतन भाजपने देखील करावयास हवे. केवळ पक्ष बदलून तोच उमेदवार पुन्हा निवडून येत असेल तर त्यात भाजपचा विस्तार खरोखरच आहे का; की पक्षापेक्षा त्या उमेदवाराचा वैयक्तिक प्रभाव अधिक आहे याचाही विचार व्हावयास हवा. अर्थात केवळ विधिमंडळातील आपले संख्याबळ वाढवत राहायचे आणि कोणत्याही मार्गाने सत्ता कायम ठेवायची हाच भाजपचा उद्देश असेल तर तो सफल होत आहे. पण खरे आत्मपरीक्षण कॉंग्रेसने करावयास हवे.
आपल्याच पक्षचिन्हावर निवडून आलेले उमेदवार कालांतराने भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवितात आणि निवडून येतात याचा अर्थ कॉंग्रेसकडे अद्यापि निवडून येण्याची क्षमता आहे याची जाणीव कॉंग्रेस नेतृत्वाला व्हावयास हवी. मात्र निवडून आलेले पक्षाशी एकनिष्ठ का राहत नाहीत हाही चिंतनाचा विषय. यासाठी नेतृत्वाचा संघटनेवर विश्वास आणि कार्यकर्त्यांशी संवाद आवश्यक असतो आणि त्यासाठी सर्वस्तरावर पूर्णवेळ नेतृत्व लागते.
विविध राज्यांतील पोटनिवडणुकीत आता भाजपने ज्या 41 जागा जिंकल्या आहेत त्यात 31 कॉंग्रेसकडून काबीज केल्या आहेत हे लक्षात घेतले तरी कॉंग्रेसने किती निष्क्रियता आणि हतबलता दाखविली आहे हे स्पष्ट होईल. तेव्हा हे सगळे मुद्दे पुन्हा त्या तेवीस नेत्यांनी लिहिलेल्या पत्राशी येऊन थांबतात.