राजू गुरव
पुणे – राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील (डायट) 601 अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने ऐन सणाच्या तोंडावर वेतन न मिळाल्याने दिवाळीचा गोडवाच हिरावला आहे. मंत्रालयात गलेलठ्ठ वेतन घेणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांनाही याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील 33 जिल्ह्यांत “डायट’ची कार्यालये आहेत. येथील वेतनासाठी केंद्र शासनाकडून 60 टक्के व राज्य शासनाकडून 40 टक्के याप्रमाणे निधी देण्याचे धोरण निश्चित झाले आहे. मात्र, नियमित निधी मिळत नाही.
वेतनासाठी अर्थसंकल्पिय तरतूद निश्चित नसल्याने दर महिन्याच्या वेतनाची समस्या निर्माण होत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा 3 कोटी 94 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र, तो शासनाकडून उपलब्ध होत नाही. गेल्या पाच महिन्यांपासून अवस्था आणखी बिकट झाली आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे अधिकारी, कर्मचारी संघटनेने वारंवार वेतनाच्या प्रश्नाबाबत गाऱ्हाणे,मांडले. बॅंकेच्या कर्जांचे हप्ते थकले आहेत. दिवाळी सणासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करायची अडचण निर्माण झाली आहे. शासनाला याचे काहीच सुखदुख वाटत नाही, असे म्हणत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.