आरक्षणाच्या भीतीने रातोरात इमारतींची कामे
पुणे – महापालिकेकडून तीन वर्षांपूर्वी पालिका हद्दीत समावेश केलेल्या 11 गावांच्या विकास आराखड्याची प्रक्रीया सुरू केली आहे. त्यामुळे गावांमध्ये रिकाम्या असलेल्या जागांवर आरक्षणे पडण्याच्या भितीने अनलॉकमध्ये अनधिकृत बांधकामे सुसाट सुरू आहेत.
रिकाम्या जागांवर बांधकामे झाल्यास पालिकेस आराखडा करताना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने पालिकेने या गावांतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. तसेच नव्याने झालेल्या बांधकामांचे सर्वेक्षणही हाती घेण्यात आले आहे. अनधिकृत बांधकामांना मोठ्या प्रमाणात नोटीसा बजाविण्यात येत असल्याचे तसेच पहिल्या टप्प्यात लोहगाव, मुंढवा या भागात कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
महापालिका हद्दीत ऑक्टोबर 2017 मध्ये नवीन 11 गावे घेण्यात आली. ही गावे महापालिकेत येण्यापूर्वी पीएमआरडीए हद्दीत होती. त्यामुळे या गावांचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रीया पीएमआरडीएकडून सुरू करण्यात आली होती. त्यांच्याकडून केवळ ईएलयु (प्रत्यक्ष जागा वापर सर्वेक्षण) हाती घेण्यात आले होते. ही गावे आल्यानंतर महापालिकेकडून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून आता आराखड्यातील आरक्षणे टाकण्यासाठी पीएलयू (प्रस्तावित जागा वापर) निश्चित करण्यात येणार आहे. मात्र, रिकाम्या जागेवर आरक्षण पडल्यास जागा महापालिकेस द्याव्या लागण्याच्या भितीने अनेकांकडून बांधकाम व्यावसायिकांना जागा विकण्यात आल्या असून काही व्यावसायिकांनी रातोरात अनधिकृत बांधकामे उभारण्यास सुरूवात केली आहे.
बांधकामांचे कोणतेही नियम न पाळता 10 ते 12 मजली इमारती बांधल्या जात आहेत. त्यातही, लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी स्थानिक मजूर सोबतीला घेऊन बांधकामे सुरू केली असून आता लॉकडाऊन शिथील होताना, वेगाने ही कामे पूर्ण करण्याची घाई सुरू आहे. ही बाब महापालिकेच्या लक्षात येताच, पालिकेकडून तातडीने या गावांमध्ये अनधिकृत बांधकामांची सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली असून या बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
…पोलीस बंदोबस्तात करवाई
बांधकाम तातडीने पूर्ण करून नागरिकांना ताब्यात दिल्यास तसेच इमारतीत नागरीक राहण्यास आल्यास महापालिका बांधकामावर कारवाई करणार नाही म्हणून अनेक व्यावसायिकांकडून काही घरे पूर्ण करून नागरिकांना राहण्यास दिली जात आहेत. मात्र, संपूर्ण बांधकामच अनधिकृत असल्याने त्या ठिकाणी असलेल्या रहिवाशांना बाहेर काढून पोलीस बंदोबस्तात महापालिकेने लॉकडाऊनपूर्वी धायरी परिसरात कारवाई केलेली होती. त्यामुळे इतर ठिकाणीही तशाच प्रकारे कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.