ठाणे : राज्यात कोरोनाचा आलेख उतरता असुन रुग्णांची संख्या कमी होत आहेत हे चांगले लक्षण आहे परंतु जनतेने बेपर्वाई बाळगू नये. योग्य ती खबरदारी घ्यावी. प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलावी आणि शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ठाणे जिल्हयातील कल्याण आर्ट गॅलरी येथील कोविड रुग्णालयाचा आणि टिटवाळा येथील कोविड रुग्णालयाचे ई लोकार्पण झाले. या कार्यक्रमास नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील,खासदार श्रीकांत शिंदे,आमदार विश्वनाथ भोईर, महापौर विनिता राणे, आयुक्त- कल्याण डोंबिवली डॉ. विजय सूर्यंवशी, मनपा लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, इतर देशांमध्ये (साथीच्या रोगाचा) आजार वाढत असताना आपण सावध रहाणे आवश्यक आहे. राज्यातील महामारीची लाट आपण एकत्रितपणे रोखली पाहिजे. दिवाळीच्या उत्सवात अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.
ठाणे जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे उल्लेखनीय काम झाले आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व नागरी संस्थांचे कौतुक करुन यापुढे ही योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना मुख्यमंत्री यांनी केल्या. फेरीवाले, रिक्षाचालक, टॅक्सी चालक, दुकानदार इत्यादींसह जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची वारंवार तपासणी केल्याने कोरोनाला आळा घालणे शक्य आहे.
शासकीय कार्यालयात अभ्यागतांना भेटण्यासाठी कार्यालयांमधील मोकळ्या जागेत भेट देण्यासाठी अतिरिक्त सुविधा करावी, अशा सूचना करुन मुख्यमंत्री म्हणाले, दीपोत्सवाच्या नंतर काही धार्मिक मार्गदर्शक सूचना घेऊन प्रार्थनास्थळे उघडण्याच्या संदर्भात निर्णय देण्यात येईल. प्रदूषणामुळे केसेस वाढत असल्याचे दिल्लीचे उदाहरण त्यांनी दिले आणि त्यामुळे अशी परिस्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी राज्यातील प्रदूषण टाळावे आणि या दिवाळीत फटाके टाळावेत.