भुलेश्वर -माळशिरस (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच महादेव बोरावके यांच्यावरील अविश्वास ठराव नागरिकांनी 295 मतांनी अपात्र ठरविला आहे. त्यामुळे बोरावके पुन्हा सरपंचपदावर विराजमान झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सदस्यांना दणका दिल्याचे मानले जात आहे. दरम्यान, करोनामुळे तब्बल सात महिन्यांनंतर ग्रामसभा घेण्यात आली होती.
लोकनियुक्त सरपंच बोरावके यांच्यावर तहसीलदारांच्या समवेत झालेल्या बैठकीत 10 सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केला होता. त्याचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. मात्र, करोनामुळे ग्रामसभांना स्थगिती असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. 3) सदस्यांमधून सरपंचपदासाठी निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते.
मात्र, लोकनियुक्त सरपंचांवरील ठराव ग्रामसभेतच मंजूर झाला पाहिजे असा आदेश सरकारने काढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आधीचा आदेश रद्द करून (दि. 6) ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार 3142 मतदारांपैकी 1723 जणांनी मतदान केले. 254 मते अवैध ठरली. ठरावाच्या बाजूने 587 तर विरोधात 882 मते पडली. यामुळे 295 मतांनी हा ठराव फेटाळल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अमर माने यांनी केली.