पुणे- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चार धरणे मिळून 27.78 टीएमसी म्हणजे 95.30 टक्के इतका पाणीसाठा आहे.
खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या क्षेत्रात शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतली. सद्यस्थितीत पावसाचा जोर ओसरल्याने धरणात येणारा पाण्याचा येवा कमी झाला आहे. सध्या खडकवासला धरण 100 टक्के भरले असून धरणातून नदीत सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. फक्त कालव्याद्वारे 1 हजार 155 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर पानशेत धरणही 100 टक्के भरले असून, 10.65 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तर धरणाच्या पॉवरहाऊसमधून 600 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वरसगाव धरणात 12.13 टीएमसी म्हणजे 95 टक्के, तर टेमघर धरण 84 टक्के भरले असून धरणात 3 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.