पुणे -महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हक्काचे आणि सुरक्षित घर मिळावे, यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून कर्मचारी वसाहत पुनर्विकासाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे.
येत्या चार वर्षांत महापालिकेच्या सहा वसाहतींच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण होणार असून, या प्रकल्पांमुळे महापालिकेच्या सुमारे 9,000 कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध होणार आहेत.
शहरातील विविध भागांमध्ये पुणे महापालिकेच्या 20 हून अधिक वसाहती आहेत. यापैकी साने गुरुजीनगर वसाहत, राजेंद्रनगर, वाकडेवाडी, घोरपडे पेठेतील मनपा कॉलनी क्रमांक आठ आणि नऊ व पांडवनगर या सहा वसाहतींचा पुनर्विकास करण्याचा धोरणात्मक निर्णय झाला आहे.
पुणे महापालिकेतील वर्ग एक ते वर्ग चार यातील कर्मचाऱ्यांना शासकीय सदनिका वाटप करण्याचे काम महापालिकेच्या चाळ विभागातर्फे केले जाते. सध्या या वसाहतींमध्ये जवळपास 4,500 सदनिकाधारक आहेत.
त्यापैकी 1,500 सदनिकाधारक महापालिकेचे कर्मचारी असून, उर्वरित सदनिकाधारक हे महापालिकेच्या विविध उपक्रमांमुळे बाधित झालेले किंवा पूरग्रस्त, जळीतग्रस्त आहेत. त्यांचे पुनर्वसन या वसाहतींमध्ये झाले होते.
पुणे महापालिकेच्या 26,000 कर्मचाऱ्यांपैकी 1,500 जणांच्या निवासाची व्यवस्था या वसाहतींमध्ये झाली आहे. महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या या वसाहतींचे बांधकाम 50 वर्षांपूर्वी झाले आहे.
त्या वेळची परिस्थिती आणि गरजांनुसार हे बांधकाम झाले होते. येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आता या वसाहतींचा पुनर्विकास करणे गरजेचे आहे.
त्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेले धोरणात्मक निर्णय घेतले आणि त्यावर अंमलबजावणीही सुरू केली.
या सर्व वसाहतींच्या पुनर्विकासानंतर तेथे सुसज्ज बहुमजली इमारती उभारणे शक्य होणार आहे. यामुळे सदनिकांची संख्याही वाढेल आणि महापालिकेच्या अधिकाधिक कर्मचाऱ्यांना त्यात सामावून घेता येऊ शकेल.
या पुनर्विकास प्रकल्पांतून नऊ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना निवासस्थान उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा मानस आहे. पुनर्विकासानंतर प्रत्येक पात्र कर्मचाऱ्यास 280 चौरस फुटांची सदनिका मिळणार आहे.
यापैकी साने गुरुजीनगर वसाहतीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, लवकरच बांधकामही सुरू होईल. उर्वरित पाचही वसाहतींच्या पुनर्विकासाचे काम 2021 मध्येच सुरू होणार आहे. येत्या चार वर्षांत सर्व प्रकल्प पूर्णत्वास जातील, अशी माहिती महापालिकेतर्फे
देण्यात आली.
महापालिकेच्या वसाहतीत वास्तव्य करताना कर्मचाऱ्यांना उत्तम सुविधा लाभल्या पाहिजेत. त्यांना फक्त निवारा नव्हे, तर सर्वोत्तम रहिवास लाभला पाहिजे, हे उद्दिष्ट ठेवून पुनर्विकास हाती घेण्यात आला आहे. तो वेगाने पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– मुरलीधर मोहोळ, महापौर