यंदा उन्हाळा जाणार सुसह्य
निमसाखर- नीरवांगी (ता. इंदापूर) येथील नीरा नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात सध्या नव्वद टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्यामुळे बंधारा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
नीरवांगी गावाजवळून जाणाऱ्या बीकेबीएन या रस्त्यालगत चार हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे. या गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर खोरोची रस्त्यापासून काही अंतरावर कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्यासाठी यापूर्वी तत्कालीन जलसंपदा खात्याच्या बारामती उपविभागामध्ये दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर फायबरचे ढापे बसविण्यात आले होते. यापैकी नीरा नदीवरील बारामती परिसरात एका बंधाऱ्यासाठी तर इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवर नीरवांगी परिसरात हे फायबरचे ढापे बसविण्यात आले आहेत. या बसवण्यात आलेल्या फायबर ढाप्यांच्या बाबतीत अनेक तक्रारी असल्याने तीन वर्ष वापरानंतर या ठिकाणी जलसंपदा विभागाने लोखंडी ढापे बसवण्यात यावेत, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली होती.
जलसंपदा विभागाकडून गेल्यावर्षी या ठिकाणी लोखंडी ढापे या बंधाऱ्यासाठी बसवण्यात आले. त्यामुळे या बंधाऱ्यामध्ये थोडीफार गळती वगळता यंदा बऱ्यापैकी खात्याकडून बंधाऱ्यात पाणी अडविण्यात आल्याने बंधारा साठवण क्षेत्रात बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. गेली तीन-चार वर्षात या बंधाऱ्यामध्ये जानेवारी अखेरीपर्यंतच पाणी साठा असायचा. यंदा झालेल्या दमदार पावसामुळे यंदाची भुजल पातळी सध्या बऱ्यापैकी पहावयास मिळत आहे. त्यामुळे पळसमंडळ (ता. माळशिरस) व नीरवांगी भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी हंगातील ज्वारी, गहू, मका, ऊस पिकांबरोबरच अन्य पिकांना नदीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
- शेतकरी, नागरिक समाधानी-
यंदा झालेल्या दमदार पावसामुळे या भागातील भुजल पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे. नीरवांगी, पळसमंडळ भागातील शेतकरी, नागरीकांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे.