मुळशीच्या माजी सभापतींचे तहसीलदारांकडे मागणीचे निवेदन
पिरंगुट- मुळशी तालुक्यातील टाटा धरणग्रस्त गावांचा विस्तार व्हावा यासाठी जागेची मोजणी लवकर करावी, तसेच 52 गांवे आणि वाड्या-वस्त्यांसाठी नक्की किती जागा टाटा कंपनीकडे मागायचे हे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी मुळशीच्या माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य कोमल वाशिवले यांनी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडे गुरुवारी (दि. 13) पौड येथे केली आहे.
टाटा धरण परिसरातील बार्पे-तिस्करी, आंबवणे, कुंभेरी, पोमगांव, शिरवली-चांदिवली, शेडाणी वळणे, संभवे, जामगांव, माले, मुळशी, ताम्हिणी, निवे, वडगांव, वांद्रे या ग्रामपंचायतींअंतर्गत 52 गावे आणि वाड्या-वस्त्या आहेत. या गावांत बांधकांमाना टाटा कंपनीकडून अडथळे येत असतात. या गावाच्या गावठाण विस्तारासाठी लागणारे एकूण 52 गावांचे 7/12 उतारे, जाबजबाब, पंचनामे उपजिल्हा अधिकारी पुनर्वसन विभागाला प्राप्त झाले आहेत. मात्र गावठाण विस्तारासाठी किती क्षेत्राची आवश्यकता आहे याचा अहवाल अद्यापपर्यंत सादर झालेला नाही. यामुळे धरण भागातील गावांचा विस्तार रखडलेला आहे.
यावेळी वळणेचे सरपंच समीर सातपुते, ग्रामपंचायत सदस्य अनिल मापारे, भरत खरूसे, राजू पाठारे, दता दिघे,आनंता सोनार,गणेश वाशिवले, पिटू मापारी उपस्थित होते.
- मुळशी धरणग्रस्त गावांमध्ये बांधकाम करत असल्यास टाटा कंपनीकडून अडवणूक केली जाते. तरी मुळशीतील तहसील विभाग आणि पंचायत समिती विभागाने गावठाण विस्तारासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी लवकरात लवकर करावी. म्हणजे गावठाण विस्तारासाठी आवश्यक असलेल्या जागेची टाटा कंपनीकडे मागणी करता येईल.
- – कोमल वाशिवले, माजी सभापती, मुळशी