* 6 राज्यांत 86 टक्के करोनाबळी
* बाधित बरे होण्याचे प्रमाण 62 टक्क्यांवर
नवी दिल्ली: महाराष्ट्रासह 8 राज्यांत देशातील 90 टक्के सक्रिय करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, केवळ 49 जिल्ह्यांत देशातील सुमारे 80 टक्के सक्रिय बाधित आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी येथे करोनाविषयक मंत्रिगटाची बैठक झाली. त्या बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, तामीळनाडू, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, तेलंगण, आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यांत देशातील 90 टक्के सक्रिय बाधित आहेत. त्याशिवाय, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामीळनाडू, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या 6 राज्यांत देशातील 86 टक्के करोनाबळींची नोंद झाली आहे. अवघ्या 32 जिल्ह्यांत करोना संसर्गाने 80 टक्के बाधितांचा बळी घेतला आहे.
दरम्यान, देशात बुधवार सकाळपासून 24 तासांत तब्बल 24 हजार 879 नवे करोनाबाधित आढळले. तो एकाच दिवसातील उच्चांक ठरला. नव्या बाधितांमध्ये महाराष्ट्र, तामीळनाडू, कर्नाटक, दिल्ली, तेलंगण, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश या 7 राज्यांचा वाटा 75 टक्के राहिला. देशात सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. बाधित संख्येत महाराष्ट्राने सव्वा दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तामीळनाडू आणि दिल्लीने याआधीच 1 लाखाचा टप्पा पार केला आहे. गुजरातमध्ये सुमारे 39 हजार, तर उत्तरप्रदेशात 31 हजारांहून अधिक बाधित आहेत.
देशात करोना संसर्गामुळे आणखी 487 बाधित दगावले. महाराष्ट्रातील मृतांच्या संख्येने याआधीच 9 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्याखालोखाल दिल्लीत 3 हजार 200 हून अधिक बाधित दगावले आहेत. गुजरातमधील बळींची संख्या 2 हजारांच्या घरात आहे.
बाधित आणि बळींच्या संख्येत मोठी भर पडत असली तरी बरे होणाऱ्यांचे वाढते प्रमाण आशादायी ठरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या सुमारे 2 लाख 70 हजार सक्रिय बाधित आहेत. तर आतापर्यंत 4 लाख 76 हजारांहून अधिक बाधित करोनामुक्त झाले आहेत. करोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे देशातील प्रमाण 62 टक्क्यांवर गेले आहे.