नवी दिल्ली – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालामध्ये (एनसीआरबी) देशातल्या गुन्हेगारीचा धक्कादायक आलेख समोर आला आहे. रिपोर्टनुसार, देशात दिवसाला रोज 77 बलात्कार तर 80 हत्येच्या घटना घडत आहेत. राज्यांचा विचार केल्यास सर्वाधिक हत्या उत्तर प्रदेशात आणि सर्वाधिक बलात्कार राजस्थानात नोंदवले गेले आहेत.
2020मधील गुन्हेगारीचा आलेख
देशात 2020 या वर्षात हत्येच्या 29 हजार 193 घटना नोंदवल्या गेल्या आहेत. त्यापैकी सर्वात जास्त 3,779 हत्या उत्तर प्रदेशातल्या आहेत. त्यानंतर बिहारमध्ये 3,150 आणि महाराष्ट्रात 2,163 हत्या नोंदवल्या गेल्या आहेत. तर बलात्काराच्या 28 हजार 46 केसेस नोंदवल्या गेल्यात. त्यापैकी सर्वाधिक राजस्थान तर दोन नंबर केसेस उत्तर प्रदेशातल्या आहेत. एकूण गुन्ह्यांच्या आकडेवारीत पहिले स्थान तामिळनाडू, दुसरे केरळ तर तिसरे दिल्लीचे आहे.
मेट्रो शहरांच्या यादीत दिल्लीत सर्वाधिक गुन्हे
देशातल्या 19 मोठ्या शहरांची मेट्रो शहर म्हणून गणना केली जाते. या सर्व शहरात होणाऱ्या बलात्कारांपैकी 40 टक्के बलात्कार हे एकट्या दिल्लीत तर एकूण हत्येच्या गुन्ह्यांपैकी 25 टक्के गुन्हे हे दिल्लीतले आहेत.