सनदी अधिकाऱ्याच्या कार्यालयावर केला कब्जा
मुंबई : मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्र्यांसाठी तयार करण्यात आलेल्या 602 क्रमाकांच्या दालनाचा नव्याने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांनी धसका घेतला आहे. या दालनाचा पूर्वइतिहास पाहता अजितदादांनी ते कार्यालय ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
त्याऐवजी त्यांनी सहाव्या मजल्यावरील सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या कार्यालयावर कब्जा केला आहे. या कार्यालयाची डागडूजी केल्यानंतर अजितदादा ताबा घेणार आहेत. त्यामुळे 602 क्रमांकाच्या ‘शापित’ दालनाबाबत मंत्रालयात शुभ-अशुभची चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार सोमवारी पार पडला. विस्तारानंतर शपथ घेतलेल्या मंत्र्यांनी मंत्रालयातील दालनांची शोधाशोध सुरु केली आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सत्तेचे केंद्र आहे. कारण सहाव्या मजल्यावरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची दालने आहेत.
मंत्रालयात मुख्यमंत्र्याच्या दालनानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या दालन हे सर्वात मोठे दालन आहे. मात्र ठाकरे सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील 602 क्रमांकाचे दालन स्वीकारण्यास नकार दिला आहे. आत्तापर्यंत या 602 क्रमांकाच्या दालनात ज्या-ज्या मंत्र्याने कारभार केला. त्याना राजकारणात प्रगती करता आली नसल्याची चर्चा आहे.
1999 मध्ये राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. तेव्हा छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. नियमानुसार 601 क्रमांकाचे दालन मुख्यमंत्री तर 602 क्रमांकाचे दालन उपमुख्यमंत्री यांना देण्याचा प्रघात आहे. त्यानुसार छगन भुजबळ यांनी त्या दालनाचा स्वीकार केला. कालांतराने भुजबळांवर तेलगी घोटाळ्याचा आरोप झाला आणि त्यांना मंत्रिपद सोडाव लागले.
त्यानंतर हेच दालन राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाले. अजितदादांनी याच दालनातून कारभार पाहिला. पण, सिंचन घोटाळ्यामुळे त्यांच्यावर आरोप झाले. त्यामुळे त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता.
2014 मध्ये आघाडी सरकारचा पराभव करीत भाजपाने सत्ता काबीज केली. त्यावेळी 602 दालन हे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मिळाले. एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल विभागासह अनेक खात्यांचा पदभार होता. परंतु, एमआयडीसी जमीन घोटाळ्यामुळे खडसे यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते.
खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर 602 दालन भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांना देण्यात आले होते. फुंडकर हे तत्कालीन कृषीमंत्री होते. दुर्दैवाने फुंडकर यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या रिक्त जागी भाजपाचे आमदार अनिल बोंडे यांची कृषीमंत्री म्हणून वर्णी लावत त्यांनाही तेच दालन दिले.
पण, विधानसभा निवडणुकीत अनिल बोंडे यांचा पराभव झाल्याने त्यांना घरी बसावे लागले आहे. 602 दालन हे ज्या मंत्र्यांना मिळाले त्यांच्या पदरी आरोप आणि अपयशच पडले आहे असा समज दृढ झाला आहे.
त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हे कार्यालय घेण्यास नकार देत सहाव्या मजल्यावरील सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे कार्यालय ताब्यात घेतले आहे. या कार्यालयाचेही विस्तार केल्यानंतर त्याचा ताब अजितदादा घेणार आहेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्यामध्ये मुख्य सचिव
उपमुख्यमंत्री पदाचे दालन असे सहाव्या मजल्यावर नव्हतेच. गेली पाच वर्ष राज्याला उपमुख्यमंत्रीच नव्हता. त्याच्यामुळे असणाछया दालनाचे छोटे छोटे भाग करण्यात आले आहेत. या छोट्या छोट्या भागातून कुठले मोठे दालन घ्यायचे ते मी ठरवलेले आहे.
त्यानुसार तशा सूचना दिलेल्या आहेत. सीताराम कुंटे जिथे बसायचे तिथे मी दालन उपमुख्यमंत्री म्हणून करतोय. जेणेकरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि चीफ सेक्रेटरी असे तिघेही सहाव्या मजल्यावर येतील, असे सांगतानाच एका बाजूला मुख्यमंत्री आणि एका बाजूला उपमुख्यमंत्री आणि दोघांच्यामध्ये चीफ सेक्रेटरी… असे कात्रीत सापडून ते कामं करतील, अशी मिश्किल टिप्पणीही अजित पवारांनी केली.