नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी आज आर्थिक आकडेवारीसह उत्तरप्रदेशातील योगी अदित्यनाथ सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज उत्तरप्रदेशावर 6 लाख 91 हजार कोटी रूपयांचे कर्ज असून यातील 40 टक्के कर्ज मुख्यमंत्री योगींच्या काळातील आहे. सन 2018 पासून उत्तरप्रदेशातील दर चार व्यक्तींपैकी एक व्यक्ती बेरोजगार असून या राज्यातील लाखो युवक नोकरीसाठी उत्तरप्रदेश सोडून अन्य राज्यांमध्ये गेले आहेत.
ते म्हणाले की सन 2017 मध्ये उत्तरप्रदेशचा जीडीपी 11.4 टक्के इतका होता, तो आता उणे 6.4 टक्के इतका झाला आहे. या राज्यातील दरडोई उत्पन्न एकूण राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. योगी सरकारच्या काळात राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न दोन टक्क्यांनी घटले आहे. त्यांनी सांगितले की नीती आयोगाच्याच आकडेवारी नुसार या राज्यातील दारिद्र रेषेखालील लोकांची संख्या 37.9 टक्के इतकी आहे.
उत्तरप्रदेशातील 12 जिल्ह्यातील हा आकडा 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. दारिद्य्राची ही भीषण स्थिती आहे. या राज्यातून आठ पंतप्रधान देशाला लाभले आहेत. परंतु तरीही हे राज्य गरीब राहिले ही दु:खदायक बाब आहे असेही त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की या राज्यातील शिक्षणाकडे योगी सरकारचे पुर्ण दुर्लक्ष झाले असून त्यामुळे लोकांची स्थिती भयानक झाली आहे. त्यांना चांगले भविष्य नाही. ज्या राज्यातील शिक्षकांच्या 2 लाख 77 हजार जागा रिक्त आहेत त्या राज्यातील शिक्षणाची स्थिती काय असेल याची कल्पनाच केलेली बरी असे ते म्हणाले. उत्तरप्रदेशच्या मतदारांनी मतदानाला जाताना हे आकडे समोर ठेऊन मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केले.