सुविधा मिळाल्याने माता पोहचू शकल्या रुग्णालयात
पिंपरी (प्रतिनिधी) – लॉकडाउनच्या काळात शहरात वाहतूक व्यवस्थेचा अभाव, करोना वॉर्डसाठी, क्वॉरंटाईन सेंटरसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती यामुळे वैद्यकीय व्यवस्थेवर ताण होता. तसेच सार्वजनिक वाहतुकीची साधनेही बंद होती. अशा परिस्थितीतही शहरात गर्भवती महिलांची सुखरुप प्रसुती होऊन 5 हजार 829 अर्भकांचा जन्म झाला आहे. त्यातून शहराचा जन्मदर व्यवस्थित राहिला असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे.
शहरात 22 मार्चपासून लॉकडाउन करण्यात आला होता. शहरात महापालिकेच्या वायसीएम व भोसरी नवीन रुग्णालयामध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. याचवेळी महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये इतर आरोग्य सोयी सुविधांवर भर देण्यात आला होता. जिल्ह्यातील जुन्नर, मावळ, खेड या भागातूनही प्रसुतीसाठी महिलांना दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण भागातही गर्भवती महिलांना अडचणी येऊ नये, यासाठी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या होत्या.
ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये काही अडचण आल्यास महापालिकेच्या रुग्णालयात महिलांना दाखल करण्यात येत होते. शहरात प्रामुख्याने गर्भवती महिलांना अडचण येऊ नये यासाठी पथके रवाना करण्यात आली होती. मार्च ते मे या महिन्याच्या काळात सजगपणे राबविलेल्या या उपक्रमामुळे 5 हजार 829 बालकांचा सुखरुप जन्म झाला.
गर्भवती मातांना त्यांच्या घरापासून तसेच ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातून आणण्यासाठी रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली होती. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात गर्भवती महिलांना रुग्णालयांमध्ये पोहचण्यास अडचणी आल्या नाहीत. शहरात क्वॉरंटाईन सेंटर व वॉर्ड सुरु करून बेडची संख्या वाढविण्याऱ्या आरोग्य विभागाने गर्भवती मातांचे कक्ष आणि पोषण पुनवर्सन केंद्रांकडेही विशेष लक्ष दिल्याने याठिकाणच्या अडचणी कमी झाल्या.