पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे अपघातात कुटुंबप्रमुख गमावलेल्या कुटुंबीयांना ५५ लाख रुपये मिळणार आहेत. रविवारी (दि. ३) झालेल्या लोकअदालतमध्ये मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश एम. जी. चव्हाण, अॅड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलसमोर याबाबतचा निर्णय झाला. यासाठी अर्जदारांचे वकील अॅड. एन. डी. वाशिंबेकर, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुखविंदर बिदरा, विमा कंपनीचे वकील अॅड. रमेश नेउरगावकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
हडपसर येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला. ते सेरम इन्सिस्टूट ॉफ इंडिया येथे नोकरी करत होते. ते ६ जून २०२२ रोजी पुणे-सोलापूर द्रुतगती महामार्गावरून दुचाकीवरून कामाला जात असता, हडपसर येथील साडेसतरानळी येथे पाठीमागून आलेल्या ट्र्कने दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे अॅड. एन. डी. वाशिंबेकर यांच्यामार्फत दावा दाखल केला. ट्रकची विमा कंपनी असलेल्या युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. त्यांना दरमहा ७० हजार रुपये पगार होता. अवलंबून असलेल्या व्यक्तींचा विचार करून ८० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी दाव्यात करण्यात आली होती. मात्र, रविवारी झालेल्या लोकअदालतमध्ये ५५ लाख रुपयांवर या दाव्यात तडजोड झाली.
व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना ४४ लाख भरपाई
पुणे : अपघातात मृत्यू झालेल्या 3५ वर्षीय व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना ४४ लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. रविवारी (दि. ३) झालेल्या लोकअदालतमध्ये मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश एम. जी. चव्हाण, अॅड. अतुल गुंजाळ आणि अॅड. प्रसाद मराठे यांच्या पॅनेलसमोर हा निर्णय झाला.
कस्तुराप्पा नागनाथ सुतार असे अपघातात मृत्यू झालेल्यांचे नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांच्या वतीने अॅड. अनिरूद्ध पायगुडे यांनी काम पाहिले. सुतार ५ मार्च २०२० रोजी केशवनगर मुंढवा येथून पुणे शहरात सेलेरिओ या चारचाकी गाडीतून येत होते. त्या वेळी मालट्रकने गाडीच्या पाठीमागील बाजूस ठोकर मारली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
या पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी कुटुंबीयानी अॅड. अनिरुद्ध पायगुडे यांच्यामार्फत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला. मालट्रकची विमा कंपनी असलेल्या युनिव्हर्सल सॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी व गाडीच्या मालकाच्या विरोधात दावा दाखल केला होता.
विमा कंपनीतर्फे अॅड. ऋषिकेश गानू यांनी काम पाहिले. कंपनीचे झोनल हेड लीगल क्लेम अधिकारी राजस्मिता दास, लीगल क्लेम मॅनेजर राहुल घोसाळकर, लीगल ॉफीसर अनिल शिर्के यांनी काम यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.