नवी दिल्ली – उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी राजधानी क्षेत्र दिल्ली बाहेर आंदोलन सुरू केल्यामुळे आतापर्यंत अर्थव्यवस्थेचे 50 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा व्यापाऱ्यांच्या संघटनेने केला आहे.
फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेचे महासंचालक प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, आता केंद्र सरकारने नवे कायदे दीड वर्ष अंमलात येणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या पेचप्रसंगातून मार्ग निघण्याची शक्यता वाढली आहे.
सरकार हा मुद्दा सोडविण्यासाठी ज्या समित्या स्थापन करणार आहे त्यामध्ये व्यापाऱ्यांच्या संघटनेचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधीशीवाय जर त्या प्रकरणावर तोडगा काढला गेला तर आगामी काळात व्यापारी अस्वस्थ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, या विषयाचा व्यापाऱ्यांशी संबंध आहे त्यामुळे या विषयावर तोडगा काढताना आमचे म्हणणे सरकारने ऐकून घेण्याची गरज आहे.