नवी दिल्ली – खोकला आल्यावर कफ सिरप पिणे सामान्य गोष्ट आहे. बहुतेक लोक कफ सिरपचा सर्रास वापर करताना दिसतात. गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये कफ सिरप प्यायल्याने 19 मुलांचा मृत्यू झाला होता. हे कफ सिरप नोएडाच्या एका कंपनीने बनवल्याचा दावा, अहवालात करण्यात आला आहे.
त्यानंतर आता देशात कफ सिरप बनवणाऱ्या 50 हून अधिक कंपन्या गुणवत्ता चाचणीत नापास झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय बनावटीच्या कफ सिरपचा जागतिक स्तरावर 141 मुलांच्या मृत्यूशी संबंध असल्याच्या अहवालानंतर अनेक राज्यांमध्ये केलेल्या प्रयोगशाळेतील चाचण्यांचा उल्लेख सरकारी अहवालानंतर समोर आला आहे.
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या अहवालात म्हटले आहे की, ऑक्टोबरपर्यंत जारी केलेल्या 2,104 चाचणी अहवालांपैकी 54 कंपन्यांचे 128 किंवा 6 टक्के अहवाल मानक दर्जाचे (NSQ) नव्हते.
उदाहरणार्थ, गुजरातच्या अन्न आणि औषध प्रयोगशाळेने ऑक्टोबरपर्यंत 385 नमुन्यांचे विश्लेषण केले, त्यापैकी 20 उत्पादकांचे 51 नमुने मानक दर्जाचे नसल्याचे आढळले. त्याचप्रमाणे, केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा (CDTL) मुंबईने 523 नमुन्यांचे विश्लेषण केले, त्यापैकी 10 कंपन्यांचे 18 नमुने गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले आहे.
प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळा (RDTL) चंदीगडने 284 चाचणी अहवाल जारी केले आणि 10 कंपन्यांचे 23 नमुने मानक दर्जाचे होते. इंडियन फार्माकोपिया कमिशन (IPC) गाझियाबादने 502 अहवाल जारी केले, त्यापैकी नऊपैकी 29 कंपन्या गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरल्या आहेत.