मुंबई: करोना विषाणू संसर्ग प्रतिबंधसाठी जगभरात सुरू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्यात येणार आहे. याअंतर्गत मुंबईत विशेष विमानांनी परतणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने एकूण 88 हॉटेल्समध्ये मिळून 3340 कक्ष आरक्षित केले आहेत.
जीवघेण्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात बहुतेक सर्व देशांनी लॉकडाऊनचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय नागरिक अडकले आहेत. या सर्व नागरिकांना हवाई आणि जलमार्गे भारतात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून सुरू झालेल्या पहिल्या प्रयत्नात विविध 12 देशातून 64 विमान फेऱ्यांमधून एकूण 14,800 प्रवासी भारतात येणार आहेत. यापैकी मुंबईमध्ये एकूण सात विमानांतून सुमारे 1900 नागरिक येतील.
बांगलादेश, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधून हे नागरिक मुंबईत परतणार आहेत. परतलेल्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण केले जाणार आहे. अलगीकरण कालावधीत तपासणी केल्यानंतर कोरोना बाधा झालेली आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल.