शेती कामगार ः किमान वेतनात वाढ झाली
नवी दिल्ली, ता. 1 – शेती कामाकडील अकुशल कामगारांना रु. 3.50 ते 5.15 अशी किमान रोजंदारी त्या त्या विभागानुसार देण्यात येणार आहे. सरकारी पत्रकाप्रमाणे अर्धकुशल व कुशल कामगारांच्या वेतनातही वाढ करण्यात आली आहे. हे वेतन केंद्र सरकारने “1948 किमान वेतन’ कायद्याखाली, शेती विभागाकडे नेमलेल्या कर्मचाऱ्यांना मिळेल.
सेवानिवृत्ती वय म्हैसूर सरकारने 55 वर्षे केले
बंगलोर – सेवानिवृतीचे वय 58 वरून 55 वर्षे करण्याचा निर्णय म्हैसूर सरकारने घेतला आहे. याची अंमलबजावणी केव्हापासून करावयाची हा निर्णय अद्यापि झाला नाही. म्हैसूर सरकारकडील 36 टक्के सेवकांवर याचा परिणाम होणार आहे. म्हैसूर सरकारने हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.
निर्वासितांचे पुनर्वसन
नवी दिल्ली – छांब व सिंधमधील निर्वासितांचे पुनर्वसन करा, अशी मागणी जनसंघनेते अटलजी वाजपेयी यांनी पुनर्वसन मंत्री के. व्ही. रघुनाथ रेड्डी यांच्याकडे केली. सिंधमधून आलेल्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व द्यावे, अशीही वाजपेयी यांनी मागणी केली आहे.
प्रसंगी खुर्ची काढून घेणारा
जिवंत समाज हवा!
पुणे – जो समाज राजकारणी लोकांना खुर्चीवर बसवतो आणि वेळप्रसंगी त्यांची खुर्ची काढण्यास मागे पाहत नाही, असा जिवंत समाज आज निर्माण व्हावयास हवा, असे उद्गार बाळासाहेब ठाकरे यांनी कसबा पेठेतील एका सभेत बोलताना काढले. ते पुढे म्हणाले, हिंदु-मुस्लीम या दोन धर्मांमध्ये ब्रिटिशांनी पाडलेले भगदाड हे शासन तसेच ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु हिंदु-मुस्लीम व ख्रिश्चन समाज एकत्र येऊन त्यांनी या राष्ट्राचे चित्र बदलावयास हवे.