पुणे – शालेय क्रीडामधून बंद झालेले सुमारे 48 खेळ पुन्हा सुरू करण्यात येत आहेत, अशी घोषणा गुरुवारी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री ऍड. आशिष शेलार यांनी येथे केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात आयोजित केलेल्या “फिट इंडिया’ या मालिकेतील एक कार्यक्रम वडगाव शेरी येथील महापालिका शाळेत गुरुवारी आयोजित केला होता. ऍड. शेलार हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, खेळ हा एकात्मकतेचा भाव जोपासणारा संस्कार आहे. एकजुटीने खेळ खेळल्यानंतर त्यातून समाजात, समूहात राहण्याचा संस्कार मुलांवर होत राहतो. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खेळामुळे जोपासले जाते. म्हणून खेळ महत्त्वाचे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला योगा आणि आता एकूणच खेळांसाठी एक लोकचळवळ उभी करण्यास सुरुवात केली आहे. आपणही त्यांच्या या चळवळीत सहभागी होताना, शालेय क्रीडा विभागात बंद करण्यात आलेले सुमारे 48 खेळ पुन्हा सुरू करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ आणि जगदीश मुळीक आदी उपस्थित होते. क्रीडा संचनालयातर्फे 2017 साली बंद केलेल्या 48 खेळ पुन्हा सुरू करण्याचा शासन निर्णय गुरुवारी तातडीने जारी करण्यात आला. या खेळांमध्ये टेनिस, फुटबॉल, लंगडी यासह एकूण 48 खेळांचा समावेश आहे.