महाराष्ट्राचे हे ऋण फिटणार नाही
पुणे, दि. 13 – महाराष्ट्रातील जनतेने माझ्यावर एवढे अलोट प्रेम केले आहे की, त्यांची 5 जन्म जरी सेवा केली तरी ऋण फिटणार नाही. माझ्याविषयी, आपुलकीविषयी मी सदैव ऋणीच राहीन, असे उद्गार मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी काढले. यावेळी त्यांच्या बोलण्याचा सारा सूर निरोपाचाच होता.
मी गेली 23 वर्षे मंत्रिपदावर आहे. मुख्यमंत्री म्हणून 11 वर्षे काम केले. यापेक्षा आता जास्त काय पाहिजे? मी पूर्ण समाधानी आहे. कारण फारशी आशा ठेवली नव्हतीच, वेळ येईल तेव्हा गेले पाहिजे, मात्र जनतेची सेवा करण्याची वृत्ती सदैव पाहिजे. मिनिस्ट्री ही गौण बाब आहे.
काश्मीरची स्वायत्तता अबाधित राहील
श्रीनगर – 1953 नंतर काश्मीरला लागू करण्यात आलेल्या कायद्याची पुन्हा तपासणी करण्यात येऊन राज्याला नको असलेले कायदे रद्द करण्यात येतील व राज्याची अंतर्गत स्वायत्तता राखण्यात येईल, असे सार्वमत आघाडीचे अध्यक्ष मिर्झा यांनी सांगितले.
सीमाप्रश्नाचा निकाल लावा
बेळगाव- कर्नाटक विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमाप्रश्नाबाबत निवेदन करून विधानसभागृहाबाहेर येत असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आमदारावर कन्नड चळवळच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. यामुळे सीमाप्रश्नाचा त्वरित निकाल लावा असे पत्रक काढले आहे.