काश्मीरला अधिक सवलती दिल्यास इतर राज्यांतही त्याचे पडसाद उमटतील
बडोदा, दि. 9 – शेख अब्दुल्लांचे समाधान करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये ज्या घटनात्मक व राजनैतिक सवलती दिल्या जातील त्यांचे पडसाद इतर राज्यांत उठल्याखेरीज राहणार नाहीत, असा इशारा जनसंघाचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्र सरकारला दिला. ते पुढे म्हणाले, तामीळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांनी काढलेले उद्गार या बाबतीत सूचक आहेत. (करुणानिधी म्हणाले होते की, जम्मू-काश्मीरला देण्यात येणारा कोणताही खास हक्क इतर राज्यांनाही मिळालाच पाहिजे.) शेख अब्दुल्लांच्या हाती काश्मीरची सूत्रे देण्यास आणि त्यांना वझीर-ए-आझम हे पद देण्यास जनसंघाचा विरोध आहे.
महाराजांची तत्त्वे प्रत्यक्ष आचरणात आली पाहिजेत
नगर – छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आजही सर्वांना मार्गदर्शक आहे. त्यांच्या तत्त्वांची व विचारांची फक्त पूजा न करता त्यांचे प्रत्यक्ष आचरण व्हावे, असे उद्गार गृहनिर्माण मंत्री ना. दादासाहेब रूपवते यांनी येथे काढले. ते पुढे म्हणाले की, थोरांचे विचार हे फक्त देवालयातच आठवतात, ते प्रत्यक्ष आचरणात यावेत.
संसदीय लोकशाहीहून वेगळी लोकशाही स्वीकारावी लागेल
कोपरगाव – देशातील प्रचलित संसद व लोकशाही पद्धतीत सामान्य माणसाचे कल्याण होणार नसेल तर देशात वेगळ्या लोकशाही पद्धतीचा नवा विचार स्वीकारावा लागेल व ही आता काळाची गरज आहे, असे स्पष्ट विचार महाराष्ट्राचे कायदामंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी व्यक्त केले.