काश्मिरींच्या “स्वयंनिर्णय हक्का’स चीनचा पाठिंबा!
नवी दिल्ली, दि. 21 – काश्मिरी लोकांच्या “स्वयंनिर्णयाच्या हक्का’स चीनचा पाठिंबा आहे, असे चीनचे उपपंतप्रधान ली सिएन निएन यांनी पुन्हा एकदा जाहीर केले आहे. “परकीय देशाचे वर्चस्व व विस्तारवाद’ याविरूद्धच्या झगड्यासाठी सिक्कीम व आग्नेय आशियातील इतर देशांतील जनतेलाही चीनचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. चिनी जनता म्हणजे पाकिस्तानी जनतेचे “विश्वासू मित्र’ आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्याचे व सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी चीनचा पाठिंबा आहे.
केंद्र सरकारात संयुक्त आघाडी नाही
कोट्टायम् (केरळ) – केंद्र सरकारात केरळप्रमाणे संयुक्त आघाडी स्थापन करण्यात येणार नाही. कारण तेथे परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, असे आज पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्पष्ट मत व्यक्त केले.
आर्यभट्ट उपग्रहावरून पहिलेवहिले संदेश
श्रीहरीकोटा – येथील अंतराळ संशोधन केंद्राने दुपारी 2 वाजून 51 मिनिटांनी भारतीय आर्यभट्ट उपग्रहावरून मिळालेले पहिले संदेश टिपले त्यावेळी विजयाचा आनंद झाला. हे संदेश उपग्रह अंतराळात पाठविल्यानंतर 1 तास 51 मिनिटांनी येऊन पोचले. त्यावेळी उपग्रहाची दुसरी फेरी चालू होती.
विद्यापीठ हे परिवर्तनाचे साधन
पुणे – विद्यापीठ म्हणजे केवळ पदव्यांची गिरणी न बनता महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे ते एक साधन बनले पाहिजे. खालावलेला शैक्षणिक दर्जा, युवकांतील अस्थिरता याचा विचार करून पुणे विद्यापीठाने काळाचे आव्हान स्वीकारले पाहिजे, असे मत विचारवंत पी. डी. गुजराथी यांनी मांडले.