आत्मसंतुष्ट राहू नका!
शिलॉंग, दि. 24 – आत्मसंतुष्ट न राहता जीवनात अधिक मोठी ध्येये गाठण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जनतेला केले. ईशान्य डोंगरी विद्यापीठाच्या पहिल्या पदवप्रदान समारंभप्रसंगी त्या भाषण करीत होत्या. मानवतेसाठी भारताने भूतकाळात मोलाची कामगिरी केली आहे. मला अशी आशा वाटते की, तरुणांनी समर्पित भावनेने केलेल्या प्रयत्नांनी भारत यापुढे या क्षेत्रात आणखी भर घालील.
अंधश्रद्धा नष्ट करा
अंधश्रद्धा मुळापासून निर्मूलन केले पाहिजे. उद्यानात ज्याप्रकारे नको असलेले तण वाढते, तशा भारताच्या संपन्न व प्राचीन परंपरांबरोबर आलेल्या अंधश्रद्धा नष्ट केल्या पाहिजे, असे सांगून त्या म्हणाल्या, सुशिक्षित युवकांनी हे साध्य करण्यासाठी मदत करावी.
परीक्षानळीमध्ये गर्भाची वाढ
लंडन – परीक्षानळीत बालक जन्माला घालण्याचे तत्त्व वापरून महिला गरोदर राहिल्याचा दावा दोघा ब्रिटिश शास्त्रज्ञांनी केला आहे. या शास्त्रज्ञांची नावे डॉ. बॉब एडवर्डस व पॅट्रीक स्पेपटो अशी आहेत. एका महिलेच्या बीजांड-कोशातून शास्त्रज्ञांनी अंडे काढून घेतले. सदर महिलेच्या पतीच्या पुं-बीजांशी त्यांचा संयोग करून ते फलित करण्यात आले. अंड्याच्या वाढीनंतर ते पुन्हा गर्भाशयात बसविण्यात आले.
तीनपेक्षा जास्त मुले असल्यास निवडणुकीत तिकीट देऊ नये
जबलपूर – ज्यांना तीनपेक्षा अधिक मुले असतील त्यांना कॉंग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा व लोकसभा निवडणुकीत तिकीट दिले जाऊ नये, अशी सूचना विठ्ठलराव गाडगीळ यांनी केली.