शिक्षण पद्धतीत बदल हवा
गोहत्ती, दि. 23 – देशाच्या बदलत्या गरजा भागविण्यासाठी शैक्षणिक पद्धतीत बदलाची आवश्यकता पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मांडली. शिक्षण हे व्यवसायाभिमूख असावे की ज्यामुळे शिक्षणक्रम संपल्यावर विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये “श्रमप्रतिष्ठा’ निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी दृष्टिकोन बदलला पाहिजे. समाजातील गरीब वर्गाचे आर्थिक दारिद्य्र दूर करण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी खेड्यात जावे. पुढील निवडणुकीपूर्वी 20 कलमी कार्यक्रमातील व मागील निवडणुकीच्या वेळी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पुरी व्हायला हवीत.
दुसऱ्या उपग्रहाबाबत भारत-रशिया करार
मॉस्को – भारताचा दुसरा उपग्रह 1978 साली सोडण्यात येणार आहे. त्यासंबंधी आज भारत व रशिया यांच्यांतील एका करारावर सह्या झाल्या. या दुसऱ्या उपग्रहांच्या तांत्रिक तपशीलाचा करारात समावेश आहे. पहिल्या “आर्यभट्ट’ उपग्रहापेक्षा हा दुसरा उपग्रह वजनाने अधिक असेल. तसेच अधिक अत्याधुनिक यंत्रणा असेल.
शिंदे पुलाचे उद्घाटन
पुणे- ओंकारेश्वर ते बालगंधर्व जोडणाऱ्या महर्षि शिंदे पुलाचे उद्घाटन आज होत आहे. या पुलाचे जोडरस्ते ओंकारेश्वर व बालगंधर्व बाजूंकडून अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत.